ठाणे : सावरकर आणि गांधी या दोन विचारसरणींवर आपला देश उभा आहे. गांधीवादाने गेली ७० वर्षे काय फळं मिळाली, ते भोगलंय. आता ३० वर्षे सावरकरांच्या मार्गाने जाऊन पाहा. सावरकरांना अपेक्षित राष्ट्रीय हिंदुत्वाची व्याख्या खरंच केली जाते. कुठे चाललोय आपण? वाट लावली देशाची. गडकरींचा पुतळा पाडला, तर पाच लाख देईन, असे लोकशाहीने निवडून दिलेला आमदार जाहीरपणे बोलतो. कानिटकरांचा पुतळा व दालन पाडा, ५ लाख बक्षीस देईन आणि हे करणाराच शिवाजी महाराजांना खरा अपेक्षित मराठा. कोणी आणि कुठून शोधून काढलं? या सगळ्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे, मग कळेल मराठा कोण, असे रोखठोक मत शरद पोंक्षे यांनी ठाण्यात व्यक्त केले. सुयश कला-क्र ीडा मंडळाच्या वतीने आयोजित सुयश व्याख्यानमालेत त्यांनी सावरकर विचारदर्शन या विषयावर पुष्प गुंफले. ज्यांची मराठी मातृभाषा आणि महाराष्ट्र मातृभूमी आहे, ते सगळे मराठा आहेत. मात्र, समाजात जातीचं विषं पेरत चाललं आहे आणि त्याला सगळे बळी पडताहेत. आरक्षण हे प्रगतीच्या आड येते आणि आरक्षणाच्या कुबड्या ज्यांनी आतापर्यंत घेतल्या, त्यांचे चांगले झाले नाही. आरक्षण हे जातीच्या नाही, तर आर्थिक निकषांवर असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सावरकरांचे विचार कधीच शिळे होणार नाही. ते भूतकाळात जात नाहीत. प्रत्येक पिढीला ते तात्कालीक वाटतात. इतका विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. मात्र, पिकते तिथे विकत नाही. याप्रमाणे सावरकर भारतात पिकले, पण विकले नाही. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत फुले, आंबेडकरांचे कार्य महानच आहे. पण, कोणताही अन्याय सहन न करता जातीयतेविरुद्ध आवाज उठवणारे सावरकर मला त्यांच्यापेक्षा काकणभर मोठे वाटतात, असेही ते स्पष्टपणे म्हणाले. तर, ठरावीक लोकांना मोठं करण्याच्या नादात देशाचा इतिहास दाबला गेला, असे सांगून त्यांनी शिक्षणपद्धतीवरही टीका केली. (प्रतिनिधी)
‘आवाहन करून पुतळे पाडतात, कुठे चाललोय आपण?’
By admin | Updated: January 24, 2017 05:46 IST