संतप्त प्रवासी उद्या करणार मूक निषेध!

By Admin | Updated: February 2, 2016 01:57 IST2016-02-02T01:57:37+5:302016-02-02T01:57:37+5:30

धनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते या तरुणाने प्राण गमावले. वरचेवर घडणाऱ्या या अपघाती मृत्यूमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट

Angry passengers will do mute protest tomorrow! | संतप्त प्रवासी उद्या करणार मूक निषेध!

संतप्त प्रवासी उद्या करणार मूक निषेध!

अनिकेत घमंडी,  डोंबिवली
धनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते या तरुणाने प्राण गमावले. वरचेवर घडणाऱ्या या अपघाती मृत्यूमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निषेधाचे ‘ऊठ डोंबिवलीकर’ असे शीर्षक असलेले व्हॉट्सअ‍ॅप संदेश फिरू लागले आहेत. बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी डोंबिवलीकर प्रवासी व संघटनांच्या वतीने रामनगर तिकीट खिडकीजवळ मूक निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
रेल्वेमंत्री प्रभू यांचे छायाचित्र असलेला ‘मुर्दाड रेल मिनिस्ट्री’ आणि सफेद कपडे पांघरून ठेवलेला ‘सामान्य रेल्वे प्रवासी’ असा संदेश धनश्रीच्या फोटोसह दिवसभर हजारो डोंबिवलीकरांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. त्यासोबत, ऊठ डोंबिवलीकर आता तरी जागा हो... अजून किती तरुणांचे बळी घेणार ही रेल्वे? असा सवाल करणारे मेसेजही लोकांमध्ये चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमधील काही प्रतिष्ठित नागरिक, प्रवासी संघटना यांनी बुधवारच्या मूक आंदोलनाची घोषणा केली. नकाते यांच्या मृत्यूनंतरही डोंबिवलीकर आक्रमक झाले व त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, डोंबिवलीकरांचा रेल्वे प्रशासनाविरुद्धचा आक्रोश प्रभू यांच्या कानांवर जात नसल्याने या वेळी मूळ निदर्शनांचा पर्याय स्वीकारल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले.
महिलांकरिता अतिरिक्त महिला स्पेशल लोकल दिल्या जात नाहीत. बाहेरगावांहून येणाऱ्या गाड्यांतून प्रवास करण्याची मुभा महिला प्रवाशांना देताना या गाड्यांची वेळ ही भल्या पहाटे आहे, हे लक्षात घेतले जात नाही. या साऱ्यातून महिला प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचेच लक्षण आहे. धनश्रीचा मृत्यू त्याच मुर्दाड मानसिकतेमधून झाल्याचे महिला प्रवाशांना वाटते.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक पदाधिकारी आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. दररोज होणारे अपघात व तरुण-तरुणींसह अनेकांचे होणारे मृत्यू रेल्वेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचे बळी आहेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
डोंबिवलीकरांच्या यातना- भावना दिल्लीदरबारी पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. - मनोहर शेलार, अध्यक्ष प्रवासी संघटना
महिला प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या कानीकपाळी ओरडून काहीही फरक पडत नाही. महिला विशेष लोकल द्या, या मागणीला केराची टोपली दाखवली जाते, हे योग्य नाही. अजून किती बळी घेतले जाणार आहेत. यापुढे असे मृत्यू खपवून घेतले जाणार नाहीत.
- लता अरगडे, डोंबिवली
जेवढ्या गाड्या वाढवल्या आहेत, त्यामध्ये मुख्य मार्गावर गाड्या नाहीत, हे योग्य नाही. रेल्वेमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना अपघातांचे गांभीर्य नाही. ते स्वत: वातानुकूलित दालनात बसतात. त्यांना प्रवाशांच्या व्यथा काय समजणार.
- जितेंद्र विशे, डोंबिवली
केवळ डोंबिवलीच नाहीतर बदलापूर, अंबरनाथ आणि आता आसनगाव येथील प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांच्या भावनांशी कोणी खेळू नये. त्यांचा अंत बघू नये. जोपर्यंत तो शांत आहे, तोपर्यंत ठीक आहे. अन्यथा, दिवा येथे झाला तसा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. - संजय मेस्त्री

Web Title: Angry passengers will do mute protest tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.