फेरीवाले, वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: May 13, 2017 00:56 IST2017-05-13T00:56:28+5:302017-05-13T00:56:28+5:30
गावदेवी परिसरासह स्टेशन, जांभळीनाका, सॅटीस या भागात ठाणे महापालिकेची फेरीवालाविरोधी कारवाई शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती.

फेरीवाले, वाहनांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गावदेवी परिसरासह स्टेशन, जांभळीनाका, सॅटीस या भागात ठाणे महापालिकेची फेरीवालाविरोधी कारवाई शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती. शुक्रवारी फेरीवाल्यांची संख्या तुरळक होती. परंतु, सॅटीसखाली बेकायदा पार्क केलेल्या दुचाकी मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या. तसेच स्टेशन ते जांभळीनाक्यापर्यंत रस्त्यांवर बेकायदा पार्क केलेल्या वाहनांची हवा काढण्यात आली. या वेळी काही ठिकाणी किरकोळ वादही झाल्याचे दिसून आले. परंतु, जोपर्यंत स्टेशन परिसरातील फेरीवाले हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी दिला.
ठामपा उपायुक्त संदीप माळवी यांच्यावरील हल्ल्यानंतर गुरुवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे स्थानक व गावदेवी भागाचा दौरा करून गावदेवी येथील २७ गाळे जमीनदोस्त केले. त्यानंतर ठाणे स्थानक परिसरात बेशिस्तपणे उभ्या रिक्षाचालकांनाही चोप दिला होता. या कारवाईमुळे या भागात महिनाभर तरी फेरीवाले बसणार नाहीत आणि बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लागेल, अशी चर्चा शहरात सुरू झाली होती. मात्र, कारवाईला २४ तासही पूर्ण होत नाहीत, तोच शुक्र वारी सकाळपासून स्थानक परिसरात फेरीवाले ठाण मांडून बसले. तसेच स्थानक भागात रिक्षाचालकांनी मनाला वाटेल त्याप्रमाणे रिक्षा उभ्या केल्या. शुक्रवारी सायंकाळी ठामपा पथकाने पोलीस बंदोबस्तात स्थानक परिसरात कारवाई केली. आयुक्त जयस्वाल हे काही कामानिमित्त दिल्लीला गेले असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुरुवातीला गावदेवी परिसरात या पथकाने परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. तिची माहिती मिळताच स्थानक भागातील फेरीवाल्यांनी आपला गाशा गुंडाळला होता. गावदेवीमधील कारवाईनंतर हे पथक ठाणे स्थानकाच्या दिशेने निघाले. अशोक टॉकीज, स्थानक परिसर या भागात फेरीवाले आधीच पळून गेल्याने पालिकेच्या पथकाच्या हाती फारसे काही लागले नाही. मात्र, या कारवाईदरम्यान स्थानकाबाहेर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी वाहतुकीस अडथळा ठरत असल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे या भागातील दुचाकी हटवून हा परिसर वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे आदेश रणखांब यांनी दिले.