ठाण्यात अपघातग्रस्त रिक्षाला आग; रिक्षात अडकून महिलेचा जागीच मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Updated: May 3, 2023 17:21 IST2023-05-03T17:20:25+5:302023-05-03T17:21:36+5:30
पेट घेतलेल्या रिक्षाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने सुरू केले.

ठाण्यात अपघातग्रस्त रिक्षाला आग; रिक्षात अडकून महिलेचा जागीच मृत्यू
ठाणे: रिक्षावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात रिक्षाने अचानक पेट घेतला. त्याचवेळी त्या रिक्षामध्ये अडकलेल्या अनोळखी महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक राजेश कुमार यादव (४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख पोलीस चौकीजवळ घडली. मृत पावलेल्या महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
रिक्षाचालक यादव हा लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवाशी असून तो गायमुखवरून घोडबंदर रोडने ठाण्याकडे एक महिला प्रवासी घेऊन येत होता. त्यावेळी यादव याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या मधील बाजूस असलेल्या दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात रिक्षाला आग लागली. त्यावेळी ती महिला त्यामध्ये अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर यादव गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कासारवडवली पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. पेट घेतलेल्या रिक्षाच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने सुरू केले. मात्र रिक्षात अडकलेल्या महिलेला त्यांना वाचविण्यात यश आले नाही. त्या अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून ती ठाण्यात पहाटेच्या दरम्यान बैंगलोर येथून आलेल्या रेल्वेतून उतरल्याचे सीसीटीव्हीतील फूटेजद्वारे उघड झाल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. आग नेमकी कशामुळे लागली आणि आगीचा इतका भडका कसा झाला ? याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.