२७ गावांचे पाणी एमआयडीसी तोडणार?
By Admin | Updated: February 17, 2016 02:02 IST2016-02-17T02:02:45+5:302016-02-17T02:02:45+5:30
अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे

२७ गावांचे पाणी एमआयडीसी तोडणार?
कल्याण : अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आधीच ३० टकके पाणीकपातीचे संकट ओढवले असताना कोट्यवधींच्या थकबाकीप्रकरणी एमआयडीसीने केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांना नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपूर्वी थकीत बिले नाही भरली तर तेथील पाणीपुरवठा खंडीत करू असा पवित्रा एमआयडीसीने घेतल्याने आता पाणी बंद करण्यावरून संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी जूनला या गावांचा केडीएमसीत समावेश झाला. २००२ मध्ये गावे वगळल्यानंतर आजतागायत पाणीपुरवठ्याच्या बिलांची थकबाकी १०० कोटीच्या आसपास आहे.
ज्यावेळेस गावांचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू होता त्यावेळेस थकीत बिलांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, २००८ मध्ये बिलापोटी ३२ लाख रूपयांचा केलेल्या भरणा व्यतिरिक्त कोणतीही थकबाकी अद्यापपर्यंत भरली गेलेली नसल्याकडे एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी लक्ष वेधले आहे. २७ गावांपैकी आशेळे- माणेरे आणि दावडी या गावांनी थकीत बिले भरली असून सर्वाधिक सव्वाआठ कोटींची थकबाकी भोपर गावाची आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला असून सद्यस्थितीत केडीएमसीला देखील वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे जगताप म्हणाले. राजकीय दबावामुळे यापूर्वीची कारवाई ठोसपणे केली नसल्याची कबूली देत थकीत बिलांसाठी दीड महिन्यांचा कालावधी दिला आहे. बिले न भरल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे जगताप म्हणाले. थकीत पाणी बिलासंदर्भात दोन वेळा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली असून बिले भरण्याबाबत जि.प.अथवा केडीएमसीने जबाबदारी घ्यावी.