ठाण्यात २७ हजार मूर्तींचे होणार विसर्जन
By Admin | Updated: September 15, 2016 02:24 IST2016-09-15T02:24:30+5:302016-09-15T02:24:30+5:30
निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी’ असे म्हणत गुरुवारी अनंत चतुर्दशीला वाजतगाजत आणि मंगलमय वातावरणात १० दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे

ठाण्यात २७ हजार मूर्तींचे होणार विसर्जन
ठाणे : ‘निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी’ असे म्हणत गुरुवारी अनंत चतुर्दशीला वाजतगाजत आणि मंगलमय वातावरणात १० दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यादिवशी ठाणे पोलीस आयुक्तालयातील तब्बल २७ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.
दीड, अडीच, पाच, सात, गौरींसोबतच्या आणि एकादशीच्या गणपती विसर्जनानंतर गुरुवारी १० दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. विसर्जनासाठी पालिका, पोलिसांसह मंडळे, अन्य स्वयंसेवी संस्था यांची तयारी सुरु आहे. विसर्जनाच्या मिरवणुका दुपारनंतर निघतील. ठाणे पोलीस आयुक्तालयातील खाजगी आणि सार्वजनिक मंडळांच्या मिळून २७ हजार ३० गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यात खाजगी २६ हजार ३३३, तर सार्वजनिक ६९७ गणेशमूर्तींचा समावेश आहे. कल्याणमध्ये सर्वाधिक खाजगी आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. ठाणे शहरातील खाजगी ५२३८ आणि सार्वजनिक ११०, भिवंडीत खाजगी ३५६५, सार्वजनिक १३२, कल्याणमध्ये खाजगी ९४५० तर सार्वजनिक १७१, उल्हासनगरमध्ये खाजगी ३८९५, सार्वजनिक १२३ तसेच वागळे इस्टेटमध्ये खाजगी ४१८५ तर सार्वजनिक १६१ गणेशमूर्तींचे पोलिसांच्या बंदोबस्तात विसर्जन होणार आहे.
विसर्जनासाठी ठामपाची यंत्रणा सज्ज असून भाविकांनी यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. ठामपाने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे तयार केलेल्या विसर्जन महाघाटात छोट्या मूर्तींबरोबरच ५ फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना विसर्जन सोहळा पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेशभक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युतव्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृहे अशी व्यवस्था केली आहे. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावाच्या बाजूला ५० बाय ३० फुटांचे आणि १० फूट खोलीचे दोन कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत, तर उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी ४७ बाय १६ फूट लांब आणि अडीच मीटर खोलीचा व आंबेघोसाळे तलाव येथे ३० बाय ६० फूट या आकाराचा, नीळकंठ वुड्स टिकुजिनीवाडी, बाळकुम रेवाळे कृत्रिम तलाव व खारेगाव येथेही कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. (प्रतिनिधी)
या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी आरतीस्थाने, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युतव्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलीस यंत्रणेबरोबरच मनपा सुरक्षारक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरुद्ध अकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करणार आहेत.
कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.