पालघर/वसई : विविध मागण्यांंसाठी एस.टी.कामगार संघटनेद्वारे १४ आॅक्टोबरला राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालघर येथील विभागी कार्यालासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कामगार धरणे आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून मनमानी कारभार केला जात आहे. आर्थीक प्रश्नांची अंमलबजावणी निधीअभावी वेळेवर केली जात नाही. संघटनेच्या हक्कांवर बाधा आणली जात आहे. पदाधिकाऱ्यांवर आकसपुर्वक कारवाई केली जात आहे.शिस्त व आवेदन पद्धतीचा भंग करून निरनिराळी परिपत्रके प्रसारीत केली जात आहेत. नफ्याची नियते बंद केल्यामुळे तोटा येत आहे. कामगारांच्या वेतनात अपेक्षित वाढ केली जात नाही. या सर्व बाबींमुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांची पुर्तता समबद्ध काळात होणे आवश्यक आहे. ही पुर्तता न झाल्यामुळे १४ आॅक्टोबरला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेद्वारे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले. राज्य परिवहनाच्या कामगारांना सातवा वेतन लागू करावे, त्यांना शासनात विलीन करण्यात यावे.कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, नवीन कामगार करार होईर्पंत २५ टक्के अंतरिम वाढ लागू करावी.महागाई भत्त्याची ७५ टे थकबाकी दिवाळीपुर्वी देण्यात यावी. तसेच दिवाळी भेट म्हणून पंधरा हजार रुपये देण्यात यावे. थेट प्रवासी नसल्याचे कारण देवून बंद केलेल्या जादा नफ्याच्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. अशी माहिती विभागी अध्यक्ष भरत पेंढारी यांनी दिली. (प्रतिनिधी)
१४ आॅक्टोबरला एसटीचे आंदोलन
By admin | Updated: October 13, 2016 03:13 IST