अमृत अभियानांतर्गत १ हजार कोटींची कामे
By Admin | Updated: June 25, 2016 01:33 IST2016-06-25T01:33:36+5:302016-06-25T01:33:36+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत

अमृत अभियानांतर्गत १ हजार कोटींची कामे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत पाणीपुरवठा आणि मलनि:सारणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या माध्यमातून एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत.
‘अमृत’ अभियानांतर्गत २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. भविष्यात एमआयडीसीवर अवलंबून न राहता उल्हास नदीतून थेट पाणी उचलून त्याचे शुद्धीकरण करून जलकुंभाद्वारे त्याचा पुरवठा करण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, या योजनेची अंदाजे किंमत ३९९ कोटी इतकी प्रस्तावित आहे.
२७ गावांव्यतिरिक्त महापालिका हद्दीतही सात नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने नवीन मुख्य जलवाहिन्या टाकणे व शहरातील नवीन विकसित झालेल्या हद्दीत वितरण व्यवस्था उभी करणे, नवीन जलकुंभांचे झोन तयार करून अस्तित्वात असलेल्या झोनमध्ये बदल करणे व समप्रमाणात वाटप करण्यासाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका हद्दीतील झपाट्याने विकसित होत असलेल्या कल्याण परिसरातील उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळिवली, गंधारे, कचोरे, लोकग्राम तर डोंबिवली विभागातील चोळे, कोपर, मोठागाव, ठाकूरवाडी व टिटवाळा विभागातील पश्चिम व पूर्वमध्ये मलनि:सारण व्यवस्थेसाठी १३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अस्तित्वातील मलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कल्याणमधील १६ दशलक्ष लीटर, तर डोंबिवलीतील १४ दशलक्ष लीटर क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. शहाड ते टिटवाळा दरम्यान मोहने, मोहिली, बल्याणी, टिटवाळा आदी भागांत मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्पाच्या कामासाठी १४२ कोटींचा अहवाल तयार केला.