कृत्रिम तलावात १,९९४ गणेश मूर्तींचे विसर्जन
By Admin | Updated: September 8, 2016 02:23 IST2016-09-08T02:23:32+5:302016-09-08T02:23:32+5:30
पर्यावरण संवर्धनाकरिता गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करा, या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला

कृत्रिम तलावात १,९९४ गणेश मूर्तींचे विसर्जन
कल्याण : पर्यावरण संवर्धनाकरिता गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करा, या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला असून मंगळवारी दीड दिवसाच्या १ हजार ९९४ गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने डोंबिवलीत ७, तर कल्याणमध्ये ३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील विसर्जन घाटांवरील गर्दी कमी व्हावी आणि पर्यावरणाभिमुख संकल्प राबवण्याच्या उद्देशाने हे तलाव तयार करण्यात आले आहेत.
महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गणेशभक्तांना कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, मंगळवारी दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी महापौर देवळेकर, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्थानकाजवळील कृत्रिम तलावाला भेट देऊन तेथील विसर्जनव्यवस्थेची पाहणी केली. या वेळी त्यांनी विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला असता भक्तांच्या सोयीसाठी टेबलांची संख्या वाढवणे, निर्माल्यासाठी आणखी कर्मचारी नियुक्त करणे, अशा प्रकारच्या सूचना नागरिकांनी केल्या. यावर, महापौरांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले यांना सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)