डेव्हिस चषक सामने पाकऐवजी तटस्थस्थळी हवेत - एआयटीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:51 IST2019-08-09T01:51:26+5:302019-08-09T01:51:47+5:30
इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी डेव्हिस चषकाचे सामने प्रस्तावित आहेत.

डेव्हिस चषक सामने पाकऐवजी तटस्थस्थळी हवेत - एआयटीए
नवी दिल्ली: पाकिस्तानसोबतच्या संबंध विच्छेदाच्या पार्श्वभूमीवर अ.भा. टेनिस संघटनेला (एआयटीए) डेव्हिस चषक टेनिसचे आयोजन पाकिस्तानात नव्हे तर तटस्थस्थळी हवे आहे. इस्लामाबाद येथे १४ आणि १५ सप्टेंबर रोजी डेव्हिस चषकाचे सामने प्रस्तावित आहेत.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने काढल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारतासोबतचे राजकीय संबंध कमी केले.
पाकिस्तानातील भारतीय राजदूताला देश सोडून जाण्यास सांगितले. गुरुवारी पाकने समझोता एक्स्प्रेसदेखील बंद केली. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी एआयटीए महासचिव हिरण्यमय चॅटर्जी यांनी राजकीय संबंधांचा विपरीत परिणाम लढतीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले,‘सध्या काही बोलणार नाही. एक- दोन दिवस प्रतीक्षा करू. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडे परिस्थितीवर लक्ष देत निर्णय घेण्याची विनंती करू. गरज भासल्यास तटस्थस्थळी सामने खेळविण्याची विनंती केली जाईल.’
चॅटर्जी पुढे म्हणाले की, ‘पाकने व्हिसा नाकारल्यास आम्ही तेथे जाऊ शकणार नाही. व्हिसा दिला तरी पुरेशी सुरक्षा मिळेलच याची खात्री नाही.’ भारताच्या संघाने याआधी १९६४ साली पाकचा दौरा केला होता. उभय देशांतील संबंध २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ताणले गेले. पाकने अनेक सामने तटस्थ ठिकाणी खेळले आहेत. आम्ही पाकला जाणार नाही, असे म्हणत नाही, पण तेथील परिस्थिती नाजूक आहे. तर अन्यत्र सामने खेळविण्यास आयटीएफने नकार दिल्यास काय, असा सवाल करताच चॅटर्जी म्हणाले, ‘सुरक्षेचे नियम आयटीएफने तयार केले आहेत. काही अघटित झाल्यास जबाबदारी त्यांची असेल. याच कारणांमुळे आम्ही परिस्थितीवर गंभीर विचार करण्याची विनंती केली आहे.’ (वृत्तसंस्था)
निर्णयाचा सन्मान करू: पीटीएफ
पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष(पीटीएफ)सलीम सैफुल्लाह खान यांनी दोन्ही देशांतील तणावामुळे आयटीएफ डेव्हिस चषकाबाबत जो निर्णय घेईल, त्याचा पूर्ण सन्मान करू, असे म्हटले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना खान म्हणाले,‘ इस्लामाबाद अद्याप सुरक्षित स्थळ आहे. तणाव वाढला तरी तो निवळू शकतो. आमच्यासाठी खेळाडूंचे हित सर्वतोपरी आहे. जय- पराजय महत्त्वाचा नाही, सुरक्षेला महत्त्व आहे.’ ही लढत तटस्थ ठिकाणी होईल, असे म्हणणे सध्यातरी घाईचे ठरेल. आयटीएफला वाटत असेल की सामन्याचे स्थळ बदलले पाहिजे तर मात्र आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करू.