Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या जागतिक पटलावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे केवळ एक तंत्रज्ञान नसून ते सत्ता आणि अर्थव्यवस्थेचे नवीन केंद्र बनले आहे. अमेरिका आणि चीन या देशांनी एआयच्या पायाभूत सुविधा, सुपरकॉम्प्युटर आणि डेटा सेंटरमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या तुलनेत भारत हार्डवेअर आणि संसाधनांच्या बाबतीत आजही काहीसा मागे आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. आपल्याकडील सामाजिक रचना, नोकरशाही आणि तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन यातही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत पिछाडी दिसते.
परंतु या नाण्याला दुसरी आणि अत्यंत तेजस्वी बाजू आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली असो वा लंडनमधील संशोधन केंद्रे, आजच्या बहुतांश एआय नवकल्पनांच्या मागे 'भारतीय मेंदू' हाच सर्वांत मोठा कणा आहे. जगाला चकित करणाऱ्या चॅटजीपीटीपासून ते विज्ञानातील कठीण कोडी सोडवणाऱ्या अल्फाफोल्डपर्यंत, प्रत्येक क्रांतीच्या केंद्रस्थानी भारतीय संशोधक आणि नेतृत्व आहे.
१. एआयचा मूळ शिल्पकार : आशिष वसवानी आणि 'Transformer' क्रांती एआयच्या इतिहासात २०१७ हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. याच वर्षी गुगलच्या आठ संशोधकांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला, ज्याचे नाव होते- 'Attention Is All You Need'. या शोधनिबंधाचे मुख्य लेखक होते आशिष वसवानी.
आशिष वसवानी यांनी 'Transformer' नावाच्या अशा तंत्रज्ञानाची पायाभरणी केली, ज्याने यंत्रांना भाषेचा संदर्भ समजून घेण्याची क्षमता दिली. आज आपण जे लार्ज लँग्वेज मॉडल्स (एलएलएम) पाहतो, ज्यावर चॅटजीपीटी आधारित आहे, त्याचा आत्मा म्हणजे हा 'ट्रान्सफॉर्मर' आहे. बिट मेस्रा (BIT Mesra) चे माजी विद्यार्थी असलेल्या आशिष यांनी केवळ गुगलसाठी काम केले नाही, तर पूर्ण मानवजातीला एआयच्या एका नव्या युगात प्रवेश करून दिला. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल मानले जाणारे 'ट्युरिंग अवॉर्ड' मिळावे, अशी चर्चा आजही तज्ज्ञांमध्ये रंगते. सध्या ते 'एन्शियल एआय' या आपल्या नवीन स्टार्टअपद्वारे उद्योगांसाठी एआय सोल्युशन्स विकसित करत आहेत.
२. विज्ञानाचे नवे क्षितिज : पुषमीत कोहली आणि मनीष गुप्ता एआय केवळ चॅटिंगपुरते मर्यादित नाही, तर ते विज्ञानातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी वापरले जात आहे. यात पुषमीत कोहली यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. डेहरादूनमध्ये लहानाचे मोठे झालेले पुषमीत सध्या गुगल डीपमाइंडमध्ये 'एआय फॉर सायन्स' विभागाचे उपाध्यक्ष आहेत.
पुषमीत यांच्या टीमने अल्फाफोल्ड नावाचा प्रकल्प राबवला, ज्याने जीवशास्त्रातील ५० वर्षे जुने 'प्रोटिन फोल्डिंग'चे कोडे सोडवले. या शोधामुळे औषध निर्मिती (ड्रग डिस्कव्हरी) आणि कॅन्सरसारख्या आजारांवरील संशोधनाला मोठी गती मिळाली आहे. अलीकडेच रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झालेले डेव्हिड बेकर आणि डेमिस हॅसाबिस यांच्यासोबत पुषमीत यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे.
दुसरीकडे, मनीष गुप्ता हे असे व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांनी 'ब्रेन ड्रेन'ला नाकारून भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. ते गुगल रिसर्च इंडियाचे संचालक म्हणून काम करत आहेत. भारतातील बहुभाषिक संस्कृती आणि ग्रामीण समस्या लक्षात घेऊन एआयचा वापर कसा करता येईल, यावर त्यांचे संशोधन केंद्रित आहे. भारतीय भाषांमध्ये एआय संवाद साधू शकेल अशा प्रकल्पांमध्ये (उदा. प्रोजेक्ट वाणी) त्यांचे योगदान मोलाचे आहे.
३. अलेक्सा ते परप्लेक्सिटी : रोहित प्रसाद आणि अरविंद श्रीनिवास आपल्या घराघरात पोहोचलेली 'अलेक्सा' जेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे देते, तेव्हा त्यामागे रांचीचे रोहित प्रसाद यांचा मेंदू कार्यरत असतो. रोहित प्रसाद यांनी अॅमेझॉनमध्ये अनेक वर्षे एआय विभागाचे नेतृत्व केले. विशेषतः 'आर्टिफिशयल जनरल इंटेलिजन्स' (एजीआय) कडे जाण्याच्या प्रवासात त्यांनी अॅमेझॉनला दिशा दिली.
तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या गुगल सर्चला कोणी टक्कर देऊ शकत असेल, तर ते आहे परप्लेक्सिटी एआय आणि या कंपनीचे संस्थापक आहेत चेन्नईचे अरविंद श्रीनिवास. अरविंद यांनी अतिशय कमी वयात गुगलच्या मक्तेदारीला आव्हान दिले आहे. 'हुरून इंडिया रिच लिस्ट २०२५' नुसार ते भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरले आहेत. त्यांची कंपनी केवळ माहिती शोधत नाही, तर ती माहिती संकलित करून त्याचा सारांश देते, जे एआयच्या भविष्यातील 'सर्च' मॉडेल आहे.
प्रा. ए. एस. मोदी (विभाग प्रमुख, माहिती व तंत्रज्ञान धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा)
Web Summary : Indian innovators are at the forefront of the AI revolution, driving advancements from foundational technologies to groundbreaking scientific discoveries and innovative search models, globally.
Web Summary : भारतीय आविष्कारक एआई क्रांति में सबसे आगे हैं, जो बुनियादी तकनीकों से लेकर अभूतपूर्व वैज्ञानिक खोजों और नवीन खोज मॉडलों को विश्व स्तर पर चला रहे हैं।