चेन्नई : भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 योजनेवर साऱ्या जगाच्या नजरा होत्या. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखादे यान उतरणार होते. मात्र, पृष्ठभागापासून अवघ्या 2 किमीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने या योजनेला काहीसा धक्का बसला आहे. तरीही इस्त्रोच्या लढवय्या शास्त्रज्ञांनी यानाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, मातीमध्ये अँटेना अडकल्याने हे प्रयत्न फोल ठरले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांसाठी काम करण्यासाठी बनविण्यात आले होते. यामुळे इस्त्रो आणि नासाकडे आता केवळ 5 दिवस उरले आहेत.
अशा प्रकारे 20 किंवा 21 सप्टेंबरला चंद्रावर रात्र होईल आणि विक्रमशी संपर्क करण्याच्या आशाही संपुष्टात येणार आहेत. भारताने विक्रमचा ठावठिकाणा शोधला आहे, तसेच त्याची थर्मल इमेजही मिळविली आहे. नासानेही मदतीचा हात पुढे केला आहे. नासाचा ऑर्बिटर मंगळवारी विक्रम उतरला त्या भागावरून जाणार आहे. या भागाचे फोटो नासाचा ऑर्बिटर पाठविण्याची शक्यता आहे. यामुळे काहीशा आशा पल्लवित झाल्या आहेत.
नासाने पाठविलेले फोटो खूप स्पष्ट होते. आणि 50 वर्षांपूर्वी मानवी पावलाच्या ठसे जसेच्या तसे दिसत होते. नासाचा हा ऑर्बिटर उद्या 17 सप्टेंबरला विक्रमवरून जाणार आहे. यामुळे इस्त्रोला विक्रमच्या स्थितीबाबत आणखी स्पष्टता मिळू शकणार आहे.