अर्धी लढाई जिंकली पुढच्या लढय़ासाठी तयारी सुरू - मेटे

By Admin | Updated: June 30, 2014 13:47 IST2014-06-30T13:47:39+5:302014-06-30T13:47:39+5:30

मराठा समाजाने अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आरक्षण मिळाले. मात्र तुटपुंज्या फायद्यावर आम्ही समाधानी नाही असे प्रतिपादन विनायक मेटेंनी केले आहे.

Winning half the battle ready for the next battle - Mete | अर्धी लढाई जिंकली पुढच्या लढय़ासाठी तयारी सुरू - मेटे

अर्धी लढाई जिंकली पुढच्या लढय़ासाठी तयारी सुरू - मेटे

सोलापूर : मराठा समाजाने अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आरक्षण मिळाले. मात्र तुटपुंज्या फायद्यावर आम्ही समाधानी नाही. पुढच्या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी रविवारी सोलापुरात केले.

आघाडी सरकारने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आ. मेटे यांनी स्वागत केले. मात्र त्यात अनेक त्रुटी असल्याने या आरक्षणाचा फारसा लाभ होणार नसल्याने नाराजी व्यक्त केली. मराठा समाजासाठी नवा आठवा प्रवर्ग निर्माण करणे चुकीचे असून आघाडी सरकारमधील चार-पाच मंत्र्यांच्या दबावामुळे ओबीसीमध्ये समावेश होऊ शकला नाही, असा थेट आरोप केला. खुद्द नारायण राणे यांनी मराठा समाजाला २0 टक्के आरक्षण देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्याची केलेली शिफारस श्रेयवादातून डावलण्यात आल्याचा गौप्यस्फोट आ. मेटे यांनी केला.
राज्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार मराठा समाजाची लोकसंख्या ३५ टक्के आहे. शिवसंग्रामने २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. राणे समितीने अहवालात २0 टक्क्यांची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र आठ टक्क्यांवर बोळवण करायचे ठरविले होते. अखेर १६ टक्क्यांचा निर्णय झाला. दिलेले आरक्षण तोकडे तर आहेच पण कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राच्या सूचित एससी, एसटी आणि ओबीसी असे तीनच प्रवर्ग असल्याने राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाचा केंद्रीय शाळांमधील प्रवेश, नोकर्‍यांसाठी लाभ होणार नसल्याची खंतही मेटे यांनी व्यक्त केली. केंद्राची शिष्यवृत्ती तसेच अन्य सवलती मिळणार नसतील तर या आरक्षणाचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला.
केतन तिरोडकर यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. शिवसंग्राम संपूर्ण शक्तिनिशी या न्यायालयीन लढय़ासाठी सरकारच्या पाठीशी राहील किंबहुना शिवसंग्राम संघटनेला प्रतिवादी करावे यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षणाचा आदेश बाहेर पडण्यापूर्वी केवळ बातमीवर दाखल केलेली याचिका टिकणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
------------
राजकीय पक्षासाठी प्रस्ताव
शिवसंग्राम संघटनेने आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात काम केले. विधानसभा लढण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून नोंदणीसाठी प्रस्ताव सादर केला असून ३0 जुलैपर्यंत संघटना पक्ष म्हणून अस्तित्वात येईल, असेही मेटे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली भाजपा, सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम यांची महायुती विधानसभा निवडणुकीतही अभेद्य राहील. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महायुतीच्या जागावाटपात बिघाडी होईल, हा भ्रम आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून घालविण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, दास शेळके उपस्थित होते. 

Web Title: Winning half the battle ready for the next battle - Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.