आघाडीची सत्ता उद्ध्वस्त करणार
By Admin | Updated: July 10, 2014 01:18 IST2014-07-10T01:18:03+5:302014-07-10T01:18:03+5:30
रामदास कदम : महायुतीचा निर्धार

आघाडीची सत्ता उद्ध्वस्त करणार
सोलापूर : आघाडी सरकारने तीन लाख हजार कोटींचे कर्ज करून सर्वसामान्य जनतेला वेठीला धरण्याचे काम केले आहे. या सरकारला येणाऱ्या विधानसभेत उद्ध्वस्त केल्याशिवाय महायुती स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले.
‘माझा महाराष्ट्र... भगवा महाराष्ट्र’ या कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित वार्तालापाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार शिवशरण पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, धनंजय डिकोळे, माजी नगरसेविका अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, येणाऱ्या विधानसभेत भाजप-सेनेची युती राहणारच असून महायुतीची सत्ता येणार आहे. ‘माझा महाराष्ट्र... भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत राज्यातील २८८ मतदारसंघांत शिवसेना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत, ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. एखाद्या मतदारसंघात शिवसेनेचा १० वेळा पराभव झाला असला तरी तेथे उमेदवार उभा करणार आहोत. कोणी पक्ष सोडत असेल तर सोडू द्या, सेनेला काही फरक पडणार नाही, असेही कदम म्हणाले.
महागाईबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले की, याबाबत लवकरच उद्धव ठाकरे खासदारांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी आघाडी सरकारने जे घोटाळे केले आहेत, ते बाहेर काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांना तुरुंगात टाकले जाईल. महाराष्ट्राला कर्जमुक्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
------------------------
बोलबच्चन चालणार नाही
बोलबच्चन करून मते मिळत नसतात. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. कोकण हा शिवसेनेचा भाग असून, येत्या निवडणुकीत नारायण राणेंनासुद्धा पराभूत व्हावे लागणार आहे. उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.