गजानन महाराज पालखीचे स्वागत

By Admin | Updated: July 3, 2014 01:21 IST2014-07-03T01:21:14+5:302014-07-03T01:21:14+5:30

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी सकाळी ९.३0 वा. सोलापुरात आगमन झाले

Welcome to Gajanan Maharaj Palkhi | गजानन महाराज पालखीचे स्वागत

गजानन महाराज पालखीचे स्वागत


जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहू विठोबाशी डोळेभरी ।।
सोलापूर :
पुंडलिके सुख दाखविले लोका।
विठ्ठल नाम नौका तरावया ।।१।।
जाय पंढरीसी जाय पंढरीसी ।
पाहू विठोबाशी डोळेभरी ।।२।।
अवघा पर्वकाळ तयाचिये ।
नको आणिके ठायी जाऊ वाया ।।३।।
चोखा म्हणे एैसा लाभ बांधा गाठी ।
जावोनिया मिठी पायी घाला ।।४।।
हा संत चोखा महाराजांचा अभंग गात शेगाव येथून निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी सकाळी ९.३0 वा. सोलापुरात आगमन झाले. पालखीचे स्वागत सोलापूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी केले. यावेळी परिवहन समितीचे सभापती आनंद मुस्तारे, नगरसेविका इंदिरा कुडक्याल, राजश्री कणके, नगरसेवक नागेश वल्याळ, संजय कोळी, अविनाश पाटील, माजी आमदार निर्मला ठोकळ आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताप्रसंगी सर्व मान्यवरांचे श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढे शहरातील पारंपरिक मार्गावरून ही पालखी मार्गस्थ झाली.
पालखी दि.५ जून २०१४ रोजी शेगाव येथून निघाली आहे. या पालखीत ६५0 वारकरी, १ प्रतीकात्मक गजराज, ३ अश्व, ८ वाहनांचा समावेश होता. पालखीतील वारकरी भक्तीमध्ये तल्लीन होऊन टाळ वाजवत राजा राम राम...सीता राम...जय जय राम...चा जयघोष करीत होते. ठिकठिकाणी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत होते. लहान मुलांपासून वृद्ध महिला-पुरुष मोठ्या भक्तीने गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत होते. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, नाष्टा देत होते. पांढरेशुभ्र कपडे, डोक्यावर पांढरी गांधी टोपी, हातामध्ये भगवे झेंडे घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी रांगेत जात होते. पालखीच्या पुढे बँड पथकामार्फत बॅन्जो वाजविला जात होता. त्याच्या पाठीमागे दोन घोडेस्वार आणि नंतर झेंडेधारी वारकऱ्यांच्या दोन रांगा होत्या. त्यांच्या पाठीमागील भागात वारकरी तल्लीन होऊन अभंगाच्या गीतावर टाळ वाजवत होते. पालखीतील सनई चौघड्याच्या आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
--------------------
दोन दिवस मुक्काम...
शेगाव येथून आलेल्या श्री गजानन महाराज पालखीचा आज बुधवारी कुचन प्रशालेत मुक्काम असणार आहे.
रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता शहरातील प्रमुख मार्गांवरून ही पालखी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात येऊन तेथे पालखीचा मुक्काम होणार आहे.
तेथेही कीर्तन होणार आहे. दोन्ही ठिकाणी भाविकांना कीर्तन श्रवणाचा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ही पालखी पंढरपूरकडे वारीसाठी मार्गस्थ होणार आहे.
--------------------------
३३ दिवसांचा प्रवास
५ जून रोजी शेगाव येथून निघालेली ही पालखी सोलापुरातील मुक्कामानंतर पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे. शेगाव ते पंढरपूर हा ३३ दिवसांचा प्रवास असून ७५0 कि.मी.चा पायी प्रवास पालखी सोहळ्यातून केला जातो. श्रींच्या पालखीचे हे ४७ वे वर्ष असून अखंडपणे ही वारी केली जाते.
वारकऱ्यांकरिता वैद्यकीय सेवा...
पालखीतील वारकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थानच्या वतीने वैद्यकीय सेवा दिली जाते. यामध्ये एक अ‍ॅम्बुलन्स गाडी, डॉक्टर व त्यांचे सहकारी आहेत. पालखीच्या कालावधीत वारकऱ्यांना ही वैद्यकीय सेवा दिली जाते.
पिण्याच्या पाण्याची सोय...
वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून संस्थानच्या वतीने टँकरची सोयही करण्यात आली आहे.
ठिकठिकाणी स्वागत...
श्रींच्या पालखीचे गावोगावी मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. मोठ्या श्रद्धेने, भक्तिभावाने वारकऱ्यांना अन्नदान केले जाते.
परतीचा प्रवास...
श्रींच्या पालखीचा श्री क्षेत्र पंढरपूर येथे (चतुर्दशी) चौदापर्यंत मुक्काम असतो. त्यानंतर काला करून श्रींची पालखी पौर्णिमेला परतीच्या प्रवासाला सुरुवात करते.

Web Title: Welcome to Gajanan Maharaj Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.