खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्प

By Admin | Updated: July 6, 2014 00:23 IST2014-07-06T00:23:05+5:302014-07-06T00:23:05+5:30

माऊलींचा रिंगण सोहळा : भाविकांनी केला हरिनामाचा जयजयकार

Vaishnavajan Thump | खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्प

खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्प

खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्प
माऊलींचा रिंगण सोहळा : भाविकांनी केला हरिनामाचा जयजयकार
बाळासाहेब बोचरे ल्ल वेळापूर
नाचत जाऊ त्याच्या गावा रे।
खेळीया सुख देईल विसावा।।
सकाळचे खुडूसचे रिंगण, दुपारचा धावा आणि धाव्यानंतर रंगलेली भारूडे अशी दिवसभर एकामागोमाग एक खेळाची मेजवानी असल्याने वारकऱ्यांचा शीण गेला.
खुडूस येथे सकाळचे रिंगण असल्याने खुडूसकरांनी रिंगणाची जागा स्वच्छ केली होती. विस्तीर्ण पटांगणात बहुतांश दिंड्या रिंगणात आल्या होत्या. टाळ, मृदंगाचा अखंड गजर चालू होता. कोवळ्या उन्हात देवाचा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. पटांगण मोठे असल्याने धावपट्टीही मोठी तयार करण्यात आली होती.
सकाळी नऊ वाजता माऊलींची पालखी रिंगणस्थळी आली. पालखी मध्यभागी स्थानापन्न झाल्यावर पालखीला झेंडेकऱ्यांनी कडे केले. रिंगणाच्या धावपट्टीवर अश्व सज्ज ठेवण्यात आले. शिस्तीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या सोहळ्यातील चोपदारांनी काही मिनिटांत रिंगण लावून घेतले. बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार रिंगण लावत होते. रामभाऊ चोपदार व उद्धव चोपदार दिंड्या सोडत होते. रिंगणाची तयारी अवघ्या दहा मिनिटांत करण्यात आली. भाविकांचे सहकार्य आणि पोलिसांची मदतही याकामी उपयोगी पडली. पंधराव्या मिनिटाला भोपळे दिंडीच्या जरीपटकाधारीने फेऱ्या मारून औपचारिक सुरूवात केली. शिंगतुतारी आणि टाळ, मृदंगाच्या निनादात अश्वांना दौडीसाठी सोडून देण्यात आले.
देहभान हरपलेला वैष्णवांचा मेळा या खेळाकडे डोळे भरून पहात होता आणि तो डोळ्यात साठवत होता. पुढे स्वाराचा अश्व , मागे माऊलींचा अश्व असा हा पाठशिवणीचा खेळ खेळत माऊलींनी स्वाराला कधी मागे टाकले आणि पाहता पाहता चार फेऱ्या पूर्ण केल्या हे कळले देखील नाही. सकाळच्या प्रहरी झालेल्या या खेळाचा वारकऱ्यांनी मनमुराद आनंद लुटला. उडीच्या खेळानंतर सोहळा पुढच्या वाटचालीस मार्गस्थ झाला.
---------------------------
गेली १३ वर्षे मी पायी वारी करते. चार फेऱ्या मारल्यानंतर माऊलींचा अश्व माझ्याजवळ येऊन थांबला हे पाहून मी फारच भावनावश झाले आणि तिथेच नतमस्तकही झाले. माझ्या दृष्टीने हा अद्भुत योगायोग असला तरी त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला.
- प्रतिभाताई पाचपुते
----------------------------
इंद्रायणीचे पाणी निघाले पंढरपुरी
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात डोक्यावर महादेवाची पिंड घेऊन वारी करणारे उत्तम सर्जेराव चंद्रटिके. औरंगाबाद जिल्ह्यातील गल्लेबोरगावाचे आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी घेऊन पांडुरंगाच्या चरणी धार घालण्यासाठी वारी करीत आहेत.

 

 

Web Title: Vaishnavajan Thump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.