नदीपात्रात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

By Admin | Updated: July 5, 2014 00:04 IST2014-07-05T00:04:57+5:302014-07-05T00:04:57+5:30

कुडल येथील घटना

Three schoolgirls die drowning in river bed | नदीपात्रात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

नदीपात्रात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू



अक्कलकोट : पूजेसाठी नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या गुब्याड (ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) येथील सहा शाळकरी मुली व एक मुलगा कुडल (ता़ अक्कलकोट) येथील भीमा नदीपात्रात बुडाले. यापैकी तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला़ तीन मुलींसह एक मुलगा मात्र बचावला़ ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली़ या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अक्कलकोट तहसीलदारांची गाडी संतप्त नागरिकांनी जाळली़
पाऊस पडावा म्हणून शुक्रवार असल्याने गुब्याड येथील या सर्व मुली पहाटे स्नान केल्यानंतर पालकांनी सांगितल्याने पाणी आणण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या. गावच्या परिसरात दोन किमी अंतरात पाणी मिळाले नसल्याने या मुली कुडल येथील भीमा नदी पात्रात गेल्या़ या पात्रात वाळू ठेकेदाराने वाळूचा उपसा केल्याने डबक्यात पाणी साचले होते़ डबक्यात पाण्यासाठी गेले असता भाग्यश्री सुतार, भाग्यश्री अतनुरे, महानंदा अतनुरे या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ मल्लप्पा अतनुरे, द्राक्षणी मरगूर, कावेरी मरगूर, सुवर्णा गुब्याड हे सर्व बचावले़ जे बचावले आहेत त्यांच्यावर इंडी येथील तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ वरील सर्व सात जण गुब्याड (ता़ इंडी) येथे इयत्ता सातवीत शिकत होते़
घटनेची माहिती मिळताच गुब्याड येथील ४०० पेक्षा अधिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले़ परिस्थिती संवेदनशील बनली होती़ नातेवाईकांनी एकच आक्रोश केला़ दरम्यान अक्कलकोटचे तहसीलदार गुरु बिराजदार, निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र शेळके व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी संतप्त झालेल्या जमावाने वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी व तहसीलदारांची शासकीय गाडी जाळली़ दुपारी १२ वाजता मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर गुब्याड येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले़ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले यांच्यासह ५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
----------------------------------------------
देवपूजेसाठी गेल्या मुली
आषाढ महिना सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मंगळवारी, शुक्रवारी देवाला दही, भात, कडूलिंबाची पाने व पाणी वाहण्याची प्रथा आहे़ असे केल्यास सर्वत्र पाऊस पडेल, असा नागरिकांना विश्वास वाटतो़ देवाला पाणी वाहण्याचे काम लहान मुलांकडून केले जाते़ त्यानुसार या मुली पाणी आणण्यासाठी नदीपात्रात गेल्या होत्या.
-------------------------------
शासकीय मदत मिळवून देण्याविषयी चर्चा सुरू होती, मात्र गुब्याड ग्रामस्थांनी निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय आमची गाडी पेटविली. यामुळे ग्रामस्थांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.
-गुरु बिराजदार, तहसीलदार, अक्कलकोट.
घटनेची माहिती घेण्याचे काम चालू असताना काही समाजकंटकांनी मृतांच्या नातेवाईकांना भडकावून गोंधळ घातला. शासकीय वाहन पेटवून दिले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
- राजेंद्र शेळके,
पोलीस निरीक्षक, अक्कलकोट.

Web Title: Three schoolgirls die drowning in river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.