हजारोंनी अनुभवला तुकोबांचा रिंगण सोहळा
By Admin | Updated: July 6, 2014 01:25 IST2014-07-06T01:25:20+5:302014-07-06T01:25:20+5:30
पहिले उभे रिंगण : जगद्गुरूंचा सर्वत्र जयघोष

हजारोंनी अनुभवला तुकोबांचा रिंगण सोहळा
श्रीपूर: माळीनगर (ता. माळशिरस) येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात विठुराया आणि तुकोबारायांच्या जयजयकारात पहिला उभा रिंगण सोहळा झाला. दोन्ही अश्वस्वारांचा समन्वय मात्र या रिंगण सोहळ्यात दिसून आला नाही.
अकलूजचा मुक्काम पूर्ण करून तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी माळीनगरमध्ये दाखल झाली. प्रथमच माळीनगर ग्रामपंचायतीने स्वागत केले. यावेळी उपसरपंच महादेव बंडगर, सदस्य लक्ष्मण डोईफोडे, बाळासाहेब वजाळे, संग्राम भोसले, अंकुश फुले, नीलेश एकतपुरे, आशा सावंत, वंदना तुपसौंदर्य, पिसे उपस्थित होते. माळी शुगर्सतर्फे कारखान्याचे वसंत ताम्हाणे, उपाध्यक्ष विलास इनामके, परेश राऊत, शुगरकेन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश राऊत, उपाध्यक्ष सुबोध गिरमे यांनी स्वागत केले.
श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा माळीनगरमध्ये सकाळी ८.३० वाजता दाखल झाला. सर्वत्र उभे रिंगण होणार की नाही, याची सर्वांना उत्सुकता होती. शुक्रवारी अकलूजमध्ये गोल रिंगण करताना ३० वर्षांपासून धावत असणारा अश्व रिंगण न करताच निघून गेला होता. त्यामुळे येथील रिंगण होणार की नाही, याची चर्चा रंगली होती.
सकाळपासून कडक ऊन पडल्यामुळे उकाडा जाणवत होता. अश्वस्वारांमध्ये समन्वय नसल्याने उभ्या रिंगणास उशीर होत होता. पालखी सोहळ्याचा अश्व प्रथम धावल्यानंतर मोहिते-पाटील यांचे दोन्ही अश्व धावतात, परंतु पहिल्या रिंगणाला धावलाच नाही, नंतर त्यातील एक अश्व विरूद्ध दिशेने धावत गेल्याने पालखीचा अश्व व मोहिते-पाटील यांचा अश्व एकमेकांसमोर आल्यामुळे दोन्ही अश्व बिथरले आणि रिंगण सोडून बाहेर जाऊ लागले. त्यानंतर रिंगण सोहळा झाला. भाविकांचा उत्साह अपूर्व होता.