विकासाच्या भ्रमात राहिलेल्यांना व्हावे लागले पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:06+5:302021-02-05T06:45:06+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व माजी आमदार, शिवसेनेचे दिलीप माने यांच्यातच प्रामुख्याने ...

विकासाच्या भ्रमात राहिलेल्यांना व्हावे लागले पायउतार
उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व माजी आमदार, शिवसेनेचे दिलीप माने यांच्यातच प्रामुख्याने विभागले आहे. कधी माने तर कधी साठे यांच्या गटाची सत्ता गावागावात येते. त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणी मूळ शिवसेना तर कोणी भाजपच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेते. कोंडीसारख्या एखाद्या गावातच शिवसेना प्रभावी असून तेथे मागील २५ वर्षांत काका साठे, दिलीप माने व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना जम बसविता आला नाही. इतर काही गावात भाजप व शिवसेनेची सत्ता आली अन् विकासाचा भ्रमनिरास झाल्याने गेलीही; मात्र साठे व माने यांचे वर्चस्व तालुक्यावर कायम आहे. त्यामुळेच विकासाचे मुद्दे गौण ठरत अनेक गावात सत्तापरिवर्तन झाले.
सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेच्या निमित्ताने अमीर खान व किरण राव हे राळेरास, नान्नज, पडसाळी व भागाईवाडीत आले होते. यापैकी पडसाळी वगळता इतर गावात सत्तांतर झाले. पडसाळी बिनविरोध झाले.
बीबीदारफळ येथे संपूर्ण गावाच्या दोन्ही ओढ्यावर बंधारे बांधून तसेच दुष्काळी परिस्थिती असताना शिरापूर सिंचनच्या पाण्याने सर्व तलाव भरुन घेऊन संपूर्ण शेती ओलिताखाली आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. कोठूनही निधी आणून गावात कामे तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना राबवूनही सत्तांतर झाले.
-----
दृष्टिक्षेप..
- वाॅटर कपचे बक्षीस मिळालेल्या बेलाटी, भागाईवाडी, वांगी गावात सत्तांतर.
- पाच वर्षे विकासात अग्रभागी असलेल्या हिरजच्या सरपंच व उपसरपंच नव्याने सदस्य नाहीत.
- वाॅटर कप स्पर्धेत काम केलेले जयश्री काळे, समाधान भोसले (खेड), सुनील जाधव, संजय पौळ (गुळवंची), शिरीष म्हमाणे, योगेश गवळी,
- संभाजी दडे (नान्नज), राधा क्षीरसागर, संजय लंबे, सुनील पाटील, अजित पाटील(कळमण), नितीन भोसले(भोगाव), मनोज साठे (वडाळा), नागनाथ माने (राळेरास) हे स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्ती निवडून आले.
- वाॅटर कप व सर्वच अभियानात आघाडीवर असलेल्या वडाळ्यात काका साठे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली आहे.
----