संस्कृतींची सरमिसळ थांबवा: पाटणकर
By Admin | Updated: July 29, 2014 01:10 IST2014-07-29T01:10:41+5:302014-07-29T01:10:41+5:30
सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार

संस्कृतींची सरमिसळ थांबवा: पाटणकर
सोलापूर: देशात अच्छे दिन नव्हे बुरे दिनच दिसत आहेत. पाश्चिमात्य, देशी या दोन संस्कृतीची सरमिसळ होत आहे, ती थांबवा़ या देशाला लाभलेली संगीत, कला, संस्कृती वाढवा, असे प्रतिपादन कोल्हापुरात होणाऱ्या १२ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ भारत पाटणकर यांनी केले़
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे १२ वे साहित्य संमेलन २ आणि ३ आॅगस्ट रोजी कोल्हापुरात होत आहे़ सोमवारी सायंकाळी गोविंदश्री सांस्कृतिक कार्यालयात संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ पाटणकर यांचा सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी बोलत असताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ पोळके होते़ व्यासपीठावर चळवळीच्या सोलापूर शाखेचे महेश कांबळे, जिल्हाध्यक्ष मदन पोळके , सचिव मनोज जाधव, सहसचिव पवन कांबळे, शरद व्हनकडे यांची उपस्थिती होती़
यावेळी डॉ़ पाटणकर यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली़ ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगत सत्तेवर भाजप सरकार आले; मात्र सरकारकडून तशी कामे दिसत नाहीत़ मागील सरकारच्या काळात टूजी, स्पेक्ट्रमसारखे घोटाळे झाले़ सरकारची तिजोरी रिकामी होत आहे़ सांगा देशाचा कसा विकास होईल? असा प्रश्नही पाटणकर यांनी यावेळी केला़
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन कांबळे यांनी केले़ सूत्रसंचालन दिनेश क्षीरसागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोज जाधव यांनी मानले़ यावेळी सहसचिव पवन कांबळे, गणेश भिसे, संतोष भद्रशेट्टी, सुभाष बनसोडे, सुभाष बनसोडे, मोहन अनपट यांच्यासह शिक्षक आणि चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते़
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी विविधता आणि नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या या देशात जोपर्यंत जातीव्यवस्था आहे तोपर्यंत हा देश महासत्ताक होऊ शकणार नसल्याचे म्हणाले़ समतेचा, मानवतेचा विचार रुजला पाहिजे यासाठी विद्रोही चळवळ कार्यरत आहे़ ही चळवळ क ोणाला शिव्या घालणारी नाही़
विद्रोही चळवळीच्या विचारधारेला मानवतेची परंपरा आहे़ महात्मा बसवेश्वरांपासून ते सांप्रदायिक चळवळींनी जाती-भेदाविरोधात लढा दिला आहे़ पंढरपुरातील विठ्ठलाला बडवे यांच्या ताब्यातून मुक्त करुन चळवळीने मोठ यश दाखवून दिल्याचे सांगत हिंदू जीवनप्रणाली तपासून घेण्याचे आवाहन पोळके यांनी केले़