पंढरपुरा समीप आली वैष्णवांची मांदियाळी
By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-06T00:12:57+5:302014-07-06T00:12:57+5:30
आज तालुक्यात प्रवेश; पददर्शनासाठी सहा तासांचा कालावधी

पंढरपुरा समीप आली वैष्णवांची मांदियाळी
पंढरपूर: करा करा लागपाठ। धरा पंढरीची वाट।... असे म्हणत विठ्ठलाच्या दर्शन ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या पालख्या व संतांची मांदियाळी पंढरपुराजवळ आली आहे. आता त्यांना विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे. ज्ञानोबा, तुकोबा यांच्यासह सर्व उद्या पालख्या पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत.
मैलोन्मैल पायी प्रवास करीत पंढरीत दाखल होण्यासाठी आतुर झालेल्या पालख्या, दिंड्या, वारकरी पंढरपूर समीप आल्याच्या भावनेने भारावून गेले असून, रविवारी टप्पा ओलांडून माऊलींसह तुकोबारायांची पालखीही पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. पालख्या माळशिरस तालुक्यात असल्याने व पंढरपूर जवळ आल्याने काही वारकरी पुढे येऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत थांबत असून, यामुळे पददर्शन रांग ज्ञानेश्वर सभामंडप, सेतू, विणे गल्ली, सारडा भवन पार करीत गोपाळपूर रस्त्यावर बांधलेल्या नऊ दर्शन पत्राशेडमधील पाच शेडपर्यंत पोहोचली आहे. एका वारकऱ्याला दर्शनासाठी सहा तासांचा कालावधी लागत असून, मुखदर्शन व आॅनलाईन दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. आणखीही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या पददर्शन रांगेत ४0 हजार भाविक असून, वाळवंटात २५ हजार, मठ, मंदिरे, धर्मशाळा, व अन्य ठिकाणी १ लाख २५ हजार असे १ लाख ९0 हजार भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पददर्शन रांगेत मंदिर समितीतर्फे पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
-----------------------------
घुसखोरी रोखण्यासाठी यंत्रणा
पददर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस, होमगार्ड, स्वयंसेवकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे घुसखोरीवर आळा घालणे शक्य झाले आहे. कोणी घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रांगेतून पुन्हा बाहेर काढण्यात येत असल्याने दर्शनाचा वेग वाढला आहे.