पालखी तळाचे अधिग्रहण आणि विकास
By Admin | Updated: July 8, 2014 23:53 IST2014-07-08T23:53:44+5:302014-07-08T23:53:44+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण: पंढरपुरात दोन टप्प्यात विकासकामे करणार

पालखी तळाचे अधिग्रहण आणि विकास
पंढरपूर: पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वरचेवर वाढत आहे. भाविकांना मूलभूत सुविधा देणे शासनाचे कर्तव्य असून, पहिल्या टप्प्यात शहरात सुरू असणाऱ्या विकासकामांना गती देऊन १६ जून २०१५ पर्यंत ही कामे पूर्ण केली जातील. ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखी तळाची जागा अधिगृहीत करून त्याठिकाणी सुविधा देण्यासाठी १२० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेसाठी मंगळवारी पंढरपुरात आल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंढरपूर, देहू, आळंदी, भोरपा डोंगर व नेवासा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने यापूर्वी ७५६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. त्या कामाचे अंदाजपत्रक वाढून १२०० कोटी रूपयांपर्यंत गेले आहे. यामुळे ही विकासकामे दोन टप्प्यात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
पालखी मार्गावरील पालखी तळाचा मुद्दा महत्त्वाचा असून, संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी तळासाठी आवश्यक असणारी जमीन अधिगृहीत करून त्याठिकाणी महिलांकरिता १०० स्नानगृहे, २० मीटर उंचीचे दोन हायमास्ट बल्ब, अंतर्गत व जोड रस्ते व १०० शौचालयांचे युनिट उभारण्यात येईल. पंढरपूर शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मठांमध्ये उभारण्यात येणाऱ्या २८०० शौचालयांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून, शहरात २११४ सुलभ शौचालये उभारण्यात येतील. चंद्रभागेच्या पात्रातील घाट दुरूस्तीसाठी ५० कोटी रूपये, नामदेव स्मारकासाठी १५ कोटी व पंढरपूर बंधारा ते विष्णूपदापर्यंत चंद्रभागा पात्रात कायम पाणी राहण्यासाठी गोपाळपूर येथे बंधारा बांधण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
पंढरपूर विकास प्राधिकरणासाठी पूर्णवेळ आयएएस अधिकारी देणे शक्य होणार नसल्याने त्या ठिकाणी सांख्यिकी विभागाची माहिती असणारा योग्य दर्जाचा अधिकारी नेमून विकासकामे केली जातील. शहराच्या विकासासाठी दोन टप्प्यांमध्ये निधी देऊन दुसऱ्या टप्प्यात संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखी तळ व पालखी मार्गाव्यतिरिक्त इतर मानाच्या पालखी तळ व पालखी मार्गाचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, आ. रामहरी रूपनवर, कॉँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, राजेश भादुले, नागेश फाटे, अरूण कंडरे उपस्थित होते.
-----------------
नवीन टोलधोरण...
केंद्र सरकारने दोन टोल नाक्यामधील अंतर ६० कि.मी. ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारने तो ४५ कि.मी. ठेवण्याचा निर्णय घेतला असून जसजसा कालावधी जाईल, तसतसा टोल दर कमी करण्यात येईल व ई-पासची व्यवस्था करून देशभरात कोणत्याही रस्त्यावरून पासधारकास जाण्याची तरतूद करण्यात येईल.
वाखरी पालखी तळानजीक एमआयटी या संस्थेने उभारलेल्या शैक्षणिक संकुलाच्या बांधकामाची माहिती घेण्यात येईल. वारकऱ्यांच्या हितास बाधा येईल, असे कृत्य झाले असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करताना सर्व वारकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले होते. गोहत्या बंदीच्या कायद्याबाबतही शासन सकारात्मक असून सर्वसमावेशक बाबींची माहिती घेऊन गोवंश हत्येबाबतचा कायदा करण्याबाबत सरकार कटिबद्ध राहील.
मेहतर समाजाच्या घरमालकांना कायम मालकी देण्याबाबत अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नाविषयी शासनाने ५६ घरमालकांना कायम तत्त्वावर घरे देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.