सदाबहार प्रेमाची खुमासदार कहाणी : ‘प्रेमा तुझा रंग कसा ?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:15 PM2020-02-14T12:15:23+5:302020-02-14T12:15:28+5:30

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम.

The opening story of evergreen love: 'How is love your color?' | सदाबहार प्रेमाची खुमासदार कहाणी : ‘प्रेमा तुझा रंग कसा ?’

सदाबहार प्रेमाची खुमासदार कहाणी : ‘प्रेमा तुझा रंग कसा ?’

googlenewsNext

प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीची भुरळ आजही प्रेक्षकांवर कायम आहे, याची प्रचिती आपणास ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हा प्रयोग पाहिल्यानंतर येते. प्रा. कानेटकरांची संवादशैली, पात्रांच्या वृत्ती व स्वभावामधून निर्माण होणारे नर्मविनोद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य. फार्स आणि विनोदी पद्धतीने जाणारे हे नाटक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम. प्रेमाला बंधन नसते, निस्सीम प्रेम म्हणजे त्याग व उदात्त समर्पण. नि:स्वार्थी, निरपेक्षपणे केलेलं प्रेम हे चिरकाल टिकणारं असतं. मात्र प्रेमात जेव्हा व्यवहार येतो तेव्हा सुरू होते असूया आणि द्वेष. मानवी जीवनाच्या एका विशिष्ट वळणावर व्यक्तीला केव्हा ना केव्हा प्रेम होतेच. या प्रेमाची परिणिती, त्याचा प्रवास भविष्यामध्ये कशारीतीने होतो याचा नाट्यानुभव म्हणजे ‘प्रेमा तुझा रंग कसा?’. 

प्रा. बल्लाळ (रवींद्र ढवळे) मानसशास्त्र विषयाचे अभ्यासक. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा (निशिगंधा घाणेकर) यांचा २५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलेले असते. यांची दोन मुलं बच्चू (सुयोग कुलकर्णी) आणि बब्बड (भावना भालेराव). नवीन पिढीस कायम असे वाटते की, जुनी पिढी आमचं प्रेम समजूनच घेत नाही. बब्बड व बाजीराव (ऋषीकेश गोटे) यांची देखील हीच अडचण आहे. बच्चू तीन वेळा प्रेमभंग होऊन परत सुशीलच्या (मीरा जोशी) प्रेमात पडतो. सुशील मात्र बच्चूवर विविध मानसशास्त्रीय प्रयोग करत असते. परंतु हे प्रयोग बच्चूस प्रेमच वाटतं. पुढे सुशील सर्जेराव सोबत लग्न करते आणि परत एकदा बच्चूचा प्रेमभंग होतो. 

रवींद्र ढवळे यांनी आपल्या दिग्दर्शनामधून आणि प्रा. बल्लाळ या मुख्य भूमिकेमधून नाटकास वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. प्रियंवदा या भूमिकेमध्ये निशिगंधा घाणेकर यांची भूमिकेची समज खूप छान होती. महेंद्र दीक्षित यांनी रंगवलेला निळूभाऊ हा साठच्या दशकाची पुरेपूर आठवण करून देतो. काळी टोपी, काळा कोट, धोतर आणि काठी यामुळे ह्यनिळूभाऊह्ण हे पात्र अधिक उठावदार झाले. त्यांची अनुनासिक बोलण्याची पद्धत आणि ह्यराम कृष्ण हरीह्ण भाव खाऊन गेले. बच्चू, सुशील, बाजीराव, बब्बड यांनी देखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला. 

अमोल काबरा यांनी पार्श्वसंगीतामध्ये प्रसंगानुरूप निवडलेली गाणी रंजकता वाढवणारी होती. नेपथ्यामध्ये अरविंद देशपांडे आणि कैलास डिडवानी यांनी उभे केलेले सुखवस्तू घर, दिवाणखाना व गॅलरी प्रयोगास पूरक होते.

‘प्रेमा तुझा रंग कसा?’ या प्रश्नाचे उत्तर देखील आपणास प्रा. कानेटकरांनी उभ्या केलेल्या पात्रामधून मिळते. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा यांच्या प्रेमाची परिपूर्णता. निळूभाऊ आपल्या पत्नीवर आजारी असून देखील तेवढेच प्रेम करतात ही त्यागीवृत्ती. अवखळ, निरागस असं प्रेम आहे बाजी आणि बब्बड यांचं. एकतर्फी, वारंवार प्रेमभंग होऊन देखील व्यवहारी शहाणपण नसणारा आणि परत प्रेमात पडणारा बच्चू. 

पूर्वी जे घडले तेच आजही घडले आणि आजपासून २५ वर्षांनंतर देखील याच पद्धतीने हे प्रेमाचे रंग असेच आपणासमोर उलगडतील. यातील मुख्य पात्र असतील आपली पुढची पिढी. प्रेमाचा हा उत्कट, तरल, भावपूर्ण, विरह, त्याग, निरपेक्ष, एकतर्फी, विरक्त प्रवास वळणावळणाने जाऊन शेवटी सप्तरंगामध्ये सामावून जातो. प्रा. कानेटकर यांनी प्रेमाचे हेच विविध रंग, प्रेमाचे हळुवार नाजूक धागे अलगदपणे आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत.
 - प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर.

Web Title: The opening story of evergreen love: 'How is love your color?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.