वाढीव सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव द्या
By Admin | Updated: July 8, 2014 00:52 IST2014-07-08T00:52:23+5:302014-07-08T00:52:23+5:30
उदय सामंत; सफाई कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न मिटविणार

वाढीव सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव द्या
पंढरपूर : पंढरपूरची लोकसंख्या व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कायमस्वरूपी जादा सफाई कर्मचारी असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून दिल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोमवारी पंढरपूरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. मेहतर समाजाच्या राहत्या घराचा महत्त्वाचा प्रश्न असून, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून द्यावा, यावर ठोस निर्णय घेतला जाणार आहे.
उर्वरित कर्मचाऱ्यांना घरे देण्याबाबतही अभ्यास करून तसा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, प्रांताधिकारी संजय तेली, नगरसेवक चंद्रकांत रणदिवे, नगरसेवक नामदेव भुईटे, विजय-प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर, गुरू दोडिया, गोयल उपस्थित होते.
----------------------
वाढीव अनुदानास प्रयत्न
दरम्यान, आषाढी वारी काळात सुरू असलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी करून वारकऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या दर्जाचीही त्यांनी पाहणी केली. आषाढी यात्रेसाठी अनुदान वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.