लाखो लिटर पाणी अक्कलकोटमध्ये वाया

By Admin | Updated: June 30, 2014 13:55 IST2014-06-30T13:55:30+5:302014-06-30T13:55:30+5:30

अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते.

Millions of liters of water was lost in Akkalkot | लाखो लिटर पाणी अक्कलकोटमध्ये वाया

लाखो लिटर पाणी अक्कलकोटमध्ये वाया

पाण्याचा योग्य वापर करा !

शंकर हिरतोट ■ अक्कलकोट
अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते. हे पाणी मोठय़ा प्रमाणात गटारीत जाते. शिवाय काही वाहनचालक चारचाकी व दुचाकी धुण्यासाठी या पाण्याचा वापर करताना दिसतात. एकेकाळी पाणीटंचाई असणार्‍या अक्कलकोटमध्ये सध्या पाण्याचा सुकाळच आहे असेच म्हणावे लागेल.
सध्या वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आगामी काळात पावसाअभावी होणार्‍या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. अन्यथा पुन्हा पाणी टंचाईला शहरवासीयांना सामोरे जावे लागणार हे नक्की ! यासाठी नगरपालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांनी दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 
सध्या शहरात एकूण ४ हजार ८00 नळ कनेक्शन आहेत. संपूर्ण शहराला रोज ५२ लाख लिटर पाण्याची गरज आहे. अशा स्थितीत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हिळ्ळी, सांगवी, हालचिंचोळी या तीनही योजना सध्या पाण्याअभावी बंद आहेत. नुकतेच कार्यान्वित झालेल्या कुरनूर-अक्कलकोट या सुजल-निर्मल योजनेवर शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु ५ ते ६ तास भारनियमन होत असल्याने उर्वरित वेळेत ताशी दोन ते अडीच लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. या उपलब्ध होणार्‍या पाण्याचे वितरण शहरातील नळधारकांना पाच दिवसांतून एकदा असे तीन टप्प्यात होते.
काही भागात तीन दिवसाआड तर काही भागाला पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. तीन दिवसांनंतर जास्त दाबाने दोनच तास पाणी सोडल्यास शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल व ते वाया जाणार नाही. सध्या काही भागात ४ ते ५ तास तर काही भागात ७ ते ८ तास पाणीपुरवठा केल्याने पाणी वाया जाते आहे.
----------
पॅरा पाईपलाईन नसल्याने सोडलेले पाणी वाया जाते. नगरपरिषदेतर्फे नळांना तोटी बसविण्यात येणार आहे. त्यानंतर या तोटीकडे नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. - अभिजित ताम्हाणे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख
 
■ तत्कालीन नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा यांच्या कार्यकाळात तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून सुजल-निर्मल योजनेतून कुरनूर-अक्कलकोट अशी नवीन पाईपलाईन मंजूर केली होती. परंतु पालिकेतील भाजप-राष्ट्रवादी या सत्ताधार्‍यांनी याला विरोध केल्याने ही योजना रेंगाळली. विद्यमान नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांनी पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित केली.

Web Title: Millions of liters of water was lost in Akkalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.