महसूलमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर ठाम
By राकेश कदम | Updated: May 30, 2025 19:54 IST2025-05-30T19:54:04+5:302025-05-30T19:54:20+5:30
आंदाेलन कायदेशीर असल्याचा दावा : पुणे विभागीय संघटनेचे निवेदन

महसूलमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर ठाम
साेलापूर - राज्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदाेलन बेकायदेशीर आहे. त्यांनी त्वरीत कामावर हजर व्हावे अन्यथा कारवाई करू असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी साेलापुरात दिला हाेता. मात्र आमचे आंदाेलन आणि कामबंद आंदाेलन कायदेशीर आहे. त्यामुळे आंदाेलन कायम राहिल, असे भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
पुणे विभागातील भूमी अभिलेख संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष संताेष जावळकाेटी, उपाध्यक्ष संताेष जाधव, सचिव विलास लिंगराज यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केले. पवार म्हणाले, राज्यातील भूमी अभिलेख कर्मचारी १५ मे पासून संपावर आहेत. आमच्या मागण्यांसाठी आम्ही सर्वप्रथम २०१५ मध्ये २४ दिवसांचा संप केला हाेता. शासनाने आश्वासन दिल्यामुळे संप स्थगित केला. त्यानंतर विविध मागण्यांसाठी आमचा लढा सुरू आहे. सुधारीत वेतनश्रेणीसाठी फेब्रुवारीमध्ये आंदाेलन सुरू केले. २७ फेब्रुवारी राेजी विभागीय उपसंचालकांकडे बैठक झाली हाेती. मार्च महिन्यात दाेनवेळा काम बंद आंदाेलन केले. सरकारच्या आश्वासनामुळे आम्ही थांबलाे. आता सरकार लक्ष द्यायला तयार नाही म्हटल्यावर आम्ही २६ एप्रिल राेजी संप पुकारणार असल्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार आम्ही १५ मे पासून संपावर आहाेत. आमच्या आंदाेलनाला राजपत्रित अधिकारी संघटनेने पाठिंबा दिला आहे.
संपाच्या काळातच चर्चा करा
कर्मचारी कामावर आले तरच चर्चा करू असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले हाेते. मात्र सरकारने आमच्यासाेबत संपाच्या काळातच चर्चा करावी. राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे आंदाेलन कायम राहिल, असा इशारा ज्ञानेश्वर पवार, संताेष जाधव यांनी दिला.
शहर, ग्रामीणचे काम ठप्प
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहर आणि ग्रामीण भागाती शेतजमीन, शहरातील प्लाॅटिंगची माेजणी यासह अनेक कामे ठप्प झाली आहेत. हा संप कधी मिटणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.