सरकार गरिबांना आरक्षण देत नाही, ही मोठी शोकांतिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST2021-04-11T04:22:08+5:302021-04-11T04:22:08+5:30
मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते. समाधान आवताडे यांच्या ...

सरकार गरिबांना आरक्षण देत नाही, ही मोठी शोकांतिका
मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते. समाधान आवताडे यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली; पण हे सरकार गरिबांना आरक्षण देत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सचिन वाझेचे बोलावते धनी हे या सरकारमधीलच बडे मंत्री आहेत. त्यातील अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी राजीनामा दिला आहे. यामुळे महाराष्ट्राचे नाव जगात बदनाम होत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरीविरोधात घेतलेल्या निर्णयाविरोधात ही निवडणूक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
मंगळवेढा- पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत. आता सुधारणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.
कोरोनाच्या काळात महिला वर्गाला, शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, अनुसूचित जाती जमाती प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटक सचिव दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजीचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे, संचालक सचिन शिवशरण, शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदी उपस्थित होते.
‘दामाजी’तील कोणाचेही सभासदत्व रद्द होणार नाही
सध्या निवडणूक प्रचारामध्ये दामाजी कारखान्याच्या १९ हजार सभासदांचे सभासदत्व रद्द होणार असल्याचा चुकीचा प्रचार विरोधकांकडून होत आहे. तो निराधार असून, राज्य सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे जे ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस घालणार नाहीत, ते अक्रियाशील ठरवत त्यांचे सभासदत्व रद्द करावे, असा आदेश काढला होता. त्याची अंमलबजावणी करत आम्ही फक्त कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. याचा अर्थ सभासदत्व रद्द झाले, असा होत नाही. ती आमची भूमिका नसून ती भूमिका आघाडी सरकारची असल्याची टीका समाधान आवताडे यांनी केली. सरकार सभासद कमी करण्याचा घाट घालून त्याचे खापर मात्र आल्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे आम्ही खपवून घेणार नाही. दामाजीच्या कोणत्याही सभासदाचे सभासदत्व जाणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचा उल्लेखही समाधान आवताडे यांनी केला. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निवडणुकीत भाजपसोबत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
फोटो लाइन :::::::::::::::::::::::
मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.