शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

पाऊस जाणायचाय तर मग पर्जन्योत्सुक व्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:10 IST

गेल्या दोन-तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभ्या केलेल्या पोराने ...

गेल्या दोन-तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभ्या केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाचवेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधूनमधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाºया प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आई-वडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन् अश्रूंचे पाझर लागून राहावेत तसं या पावसाचं झालंय.

महिनाभर काबाडकष्ट करून कशीबशी सुट्टी मिळवून गावाकडे जाताना बस चुकावी अन् रात्रभर वाट बघत बसल्यावर घरातले अणुरेणू डोळ्यापुढे फेर धरून नाचत राहावेत तसे या पावसाने फेर धरलेत. मायबापापासून फारशी कधी विलग न झालेली एखादी हरीण डोळ्याची हळद ओली नवविवाहिता पहिल्यांदा माहेरी जाताना तिला प्रवासातली रात्र मोठी वाटत जाते आणि भवतालचा काजळअंधार अधिक गहिरा वाटत जातो, नकळत एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून येत राहते अन् माहेरची ओढ अधिकच तीव्र होत जाते. कधी एकदा दिवस उजाडेल आणि घराच्या उंबरठ्यावर जाऊन धडकेन असं होऊन जाते तसं या रात्रभर कोसळणाºया पावसाचं झालंय. 

ज्यांचे कुणाचे छत्र नुकतेच हरवलेले असते त्यांना रात्रीचा पाऊस गुदमरून टाकतो, मेघात त्यांना मायबाप कधी दिसू लागतात अन् डोळ्यातला पाऊस कधी कोसळू लागतो काही केल्या उमगत नाही. जन्मदाते गेल्यानंतरची पहिली पाऊसरात्र कशी वाटते ते सांगता येत नाही. रात्रीच्या पावसात एका मोठ्या  वटवृक्षाखाली उभं असताना एखादी लकाकणारी वीज यावी अन् तिने अख्खं झाड आपल्यासोबत घेऊन जावं, आपण तसंच हतबल होऊन तिथंच त्यांची वाट बघत रात्रभर रडत उभं राहावं. त्यांची आठवण येत रहावी. त्यांनी ज्या करंगळीला धरून आपल्याला चालवलं तिला रात्रभर शहारे येत राहावेत, त्यांनी थोपटलेल्या पाठीवर रात्रभर काटे येत राहावेत, त्यांनी आपल्या भल्यापोटी कधी हातावर पट्ट्या मारल्या असतील त्या हातावरच्या त्या वळांनी पुन्हा उमटत जावं, आपल्याला सायकलवरून शाळेत सोडताना त्यांनी हात हलवून आपल्याला धीर देत राहावं अन् तो त्यांचा हात त्या रात्रभरच्या पावसात तरळत रहावा.

कधी आजारपण आलं तर त्यांनी रात्रभर माथ्यापाशी बसून राहावं आणि आपण डोळे भरून त्यांच्याकडे पाहत राहावं. जगाशी कधी भांडण झालं तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्याला हत्तीचे बळ देणाºया त्या जन्मदात्याने हळूच आपल्यासाठीही कधी अश्रू ढाळावेत आणि आपली चुकून त्याकडे नजर जावी. त्यांनी म्हणावं ‘काही नाही डोळ्यात जरा धूळ गेली होती रे !'. त्यांच्या या बोलण्याने आपल्या डोळ्यांना अश्रूंची धार लागावी अन् आपण आयुष्यात एकदाच त्यांच्या छातीवर डोकं टेकवून मनसोक्त रडावं तसं या पावसाचं झालंय.

आठवणींचे अनेक श्याममेघ एकत्र आणून नुसती काळीजवीणा झंकारत रहावी तसं या पावसाचं झालंय. रात्रभर कुणीतरी आपलंच पण अनामिक असं माणूस उंबरठ्यापाशी आलंय असं वाटत राहावं असं या रात्रभर दाराशी लगटून राहिलेल्या पावसाचं झालंय. त्याच्याही मनात तेच आलंय जे आपल्या मनात आलंय, त्याच्या आठवणींना उधाण आलंय कारण त्याने आपल्याला प्रतीक्षेत बरंच ताठकळवलंय ! दार उघडून बाहेर बघा त्याला तेच सांगायचेय जे तुम्हाला बोलायचेय. पाऊस तल्लीन होऊन पडतोय,  संततधार लागलेल्या या पावसाचे हे असं गारुड झालंय ! पाऊस घराबाहेर कोसळत असताना त्यांच्याही अंतरंगात रिमझिम सुरु असते. कालिदासाने रचलेल्या मेघदूताला जाणून घ्यायचं असेल तर साक्षर व्हावं लागतं; मात्र पावसाचं काळीज जाणून घ्यायचं असेल तर पर्जन्योत्सुकच व्हावं लागतं. मग त्यांचे सूक्त निसर्गच रचतो !  - समीर गायकवाड(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊस