करमाळा, सांगोला येथे पावसाची जोरदार हजेरी
By Admin | Updated: July 8, 2014 00:50 IST2014-07-08T00:50:03+5:302014-07-08T00:50:03+5:30
पुनर्वसू बरसला; सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आशा पल्लवित

करमाळा, सांगोला येथे पावसाची जोरदार हजेरी
करमाळा-सांगोला : सोलापूर जिल्ह्यात रोहिणी, मृग आणि आर्द्रा ही भरवशाची तिन्ही नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र पुनर्वसू नक्षत्राने जिल्ह्यात विशेषत: करमाळा व सांगोला येथे जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात हा पाऊस झाला आहे.
करमाळा : पुनर्वसू नक्षत्रात दुसऱ्या दिवशीही करमाळा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेले महिनाभर पावसाच्या ओढीने आसुसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रोहिणी,मृग,आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. दुपारी चार वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल पाऊण तास दमदारपणे पडला. तालुक्यातील गुळसडी, देवळाली, पांडे, खडकी, सरपडोह, वरकटणे, निंभोरे, केम, मांगी, रोसेवाडी, पिंपळवाडी, रावगाव, हिवरवाडी, वीट, अंजनडोह, हिसरे, फिसरे, सालसे या भागात पाऊस पडला आहे. पुनर्वसू नक्षत्रात सलग दोन दिवस पाऊस पडल्याने शेतकरी मका, सूर्यफूल,बाजरी पिकांची पेरणी करतील असे बोलले जात आहे.
सांगोल्यात दीड तास पाऊस
सांगोला : सांगोला शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात आज सोमवारी दुपारी चारनंतर अचानक पावसास सुरुवात झाली. दीड तास पडलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर पाणी वाहिले. उपनगरात पडलेल्या पावसामुळे नाल्यातून पाणी वाहू लागले. ग्रामीण भागातही रिमझिम पाऊस पडल्याचे वृत्त आहे.
शहर व तालुक्यात रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता. पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यात उन्हाळ्याची स्थिती असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. चालू वर्षी पावसाळ्यातील मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे चालल्याने शेतकऱ्यासह नागरीक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या तालुक्यात दुपारपर्यंत कडक ऊन पडत असून दुपारनंतर सतत वातावरणात बदल होत आहेत. दुपारनंतर ढगाळ वातावरणात हलकासा रिमझिम पाऊस पडत आहे.
तालुक्यात अद्यापही खरिपाच्या पेरण्यालायक पाऊस पडला नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आज सोमवारी दुपारनंतर आकाशात मेघ दाटून आले. चारनंतर पावसास सुरुवात झाली. दीड तास पडलेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरीक, आबालवृद्धांना थंडगार हवेचा दिलासा मिळाला आहे.