जिल्ह्याची वरदायिनी ‘उजनी’ने गाठला तळ
By Admin | Updated: July 3, 2014 01:29 IST2014-07-03T01:29:43+5:302014-07-03T01:29:43+5:30
पातळी मायनस : २० टक्के

जिल्ह्याची वरदायिनी ‘उजनी’ने गाठला तळ
करमाळा : लांबत चाललेल्या पावसामुळे उजनीच्या पाण्याने तळ गाठला असून, उजनी धरणाची पाणी पातळी आज मायनस २० टक्के इतकी खालावली आहे. यामुळे पिण्याच्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत.
गत दोन वर्षांत कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. उजनी धरणाचा पाणीसाठाही निच्चांकी वजा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. मागील वर्षी मात्र पुणे जिल्हा व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसाच्या जोरावर उजनी धरण साठ्यात १२३ टीएमसी म्हणजे ११३ टक्के एवढा प्रचंड पाणीसाठा झाला होता.
आज अखेर उजनी धरणातील पाणीसाठा वजा १०.२५ घनफूट म्हणजे २०.१८ टक्के आहे. धरणातील पाणीपातळी खालावली असल्याने उजनी धरण परिसरातील पिके पाण्याअभावी करपून सुकू लागली आहेत. पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाईप वाढवून विद्युत मोटारी इतत्र हलवाव्या लागत आहेत तर पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेलच्या चाऱ्या खोल कराव्या लागत आहेत.
उजनी धरणातून करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर या शहराच्या पाणीपुरवठा योजना असून, या योजनेचे जॅकवेल हळूहळू उघडे पडू लागले आहेत.
---------------
पाणीसाठा वजा १०.२५ घ. फू. म्हणजे २०.१८ टक्के
गतवर्षी पाणीसाठा ११३ टक्के म्हणजे १२३ टीएमसी
पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडू लागले.