शेतकऱ्यांसाठी खुशखबर; एफआरपी केली २९०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:54+5:302021-08-26T04:24:54+5:30
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल नव्याने एफआरपी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के साखर उताऱ्यावर एफआरपी २ ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; एफआरपी केली २९०० रुपये
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल नव्याने एफआरपी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के साखर उताऱ्यावर एफआरपी २ हजार ९०० रुपये प्रति टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साखर उताऱ्यावर ९.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला २ हजार ७५० रुपये प्रति टन मिळतील.
यापूर्वी उसाची एफआरपी २ हजार ८५० रुपये प्रति टन होती. या वेळी ५० रुपये प्रति टन वाढ झाली आहे. केंद्र सरकार दरवर्षी उसाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी एफआरपी जाहीर करते. ऊस उत्पादकांना ही किमान किंमत कारखानदारांना द्यावी लागते. ऊस उत्पादकांना आतापर्यंत ८६ हजार कोटी रुपये दिले आहेत.
सन २०२१-२१ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ९१ हजार कोटी रुपये दिले जाणार होते, त्यापैकी ८६ हजार कोटी रुपये दिले गेले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे आता ऊस उत्पादकांना पूर्वीप्रमाणे वर्षानुवर्षे त्यांच्या देयकासाठी संघर्ष करावा लागत नाही. आजच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर ८७ टक्के परतावा मिळेल.
........
चौकट
एफआरपी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. परंतु एफआरपीबरोबर साखरेची एमएसपी वाढली पाहिजे. मागील दोन वर्षे झाले एमएसपी वाढलेली नाही. त्यामुळे वाढलेल्या एफआरपी देणे कारखानदारांना अडचणीचे ठरणार आहेत.
- डॉ. यशवंत कुलकर्णी, पांडुरंग कारखाना, श्रीपूर