भुईकोट किल्ल्यावर झुडपे आणि कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:26+5:302020-12-05T04:46:26+5:30
भुईकोट किल्ल्याचा परिसर हा खूप मोठा आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तशातच किल्ल्याची निगा ...

भुईकोट किल्ल्यावर झुडपे आणि कचऱ्याचे साम्राज्य
भुईकोट किल्ल्याचा परिसर हा खूप मोठा आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तशातच किल्ल्याची निगा राखण्यासाठी कमी मनुष्यबळ असल्याने निगा राखणे शक्य होत नाही.
किल्ल्याच्या भिंतीवर मोेठमोठी झाडे-झुडपे वाढली आहेत. त्याच्या मजबुतीच्या दृष्टीने हे अतिशय वाईट आहे. काही झाडे मोठी झाल्याने त्यांची मुळे किल्ल्याच्या खालपर्यंत पसरली आहेत. भिंतीमध्ये छोटीशी फट असली तरीही झुडपे वाढण्यास सुरुवात होते.
इतर किल्ल्यांशी तुलना करता भुईकोट किल्ल्याची पडझड कमी झाली आहे. तरीदेखील आणखी सुधारणेला वाव आहे. किल्ला परिसरात गवत वाढले आहे. चार वर्षांपूर्वी कपिलसिद्ध मंदिराचे काम केंद्राच्या पुरातत्त्व विभागाने चांगले केले आहे. त्यानंतर फारसे काम झाल्याचे दिसून आले नाही. किल्ल्याच्या दोन दगडांमधील अंतर वाढत आहे.
--------
ऐतिहासिक महत्त्व
-चौदाव्या शतकात बहामनी राजवटीत सोलापुरात ही बुलंद वास्तू आकारास आल्याचे सांगितले जाते.
-किल्ल्याचा बाहेरील कोट इ.स. १३१३ मध्ये हसन गंगु बहामनी यांनी बांधला, तर आतील कोट १२ व्या शतकात बांधल्याची माहिती नमूद आहे.
-संपूर्ण किल्ल्याची बांधणी एकाच काळात पूर्ण झाली नाही. वेळोवेळी विविध इमारतींची भर पडत गेली आणि फेरफार होत गेले.
--------
किल्ल्यामध्ये झुडपे वाढली असून कचऱ्याची समस्याही आहे. किल्ल्याची काळजी घेण्यासाठी पुरातत्त्व विभागात सहायक संचालकपद निर्माण व्हायला हवे, तसेच इतर मनुष्यबळही वाढविण्यात यावा.
-डॉ. माया पाटील, पुरातत्त्वशास्त्रज्ञ
----
एक सोलापूरकर म्हणून आपणाला किल्ल्याचा अभिमान आहे. पण, हा किल्ला स्वच्छ रहावा, त्याची निगा राखली जावी, या दृष्टीने आपण जागरुक नाही. याविषयी गडप्रेमींचे प्रयत्न अपुरे पडतात.
- योगीनाथ भाईकट्टी, गडप्रेमी