भाविकांनी रात्र जागून काढली
By Admin | Updated: July 8, 2014 23:58 IST2014-07-08T23:58:46+5:302014-07-08T23:58:46+5:30
अपुरा निवारा; पावसाची हजेरी, चंद्रभागा बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप

भाविकांनी रात्र जागून काढली
पंढरपूर: पंढरपूर शहर व वाखरी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या धो-धो पावसाचा पालखीतील वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. वाखरी पालखी तळावर अपुऱ्या निवाऱ्याच्या सोयीमुळे त्यांना रात्र पाणी, चिखलात जागून काढावी लागली तर खास आषाढीसाठी सोय करण्यात आलेल्या चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानावर तळे साचल्याने वारकऱ्यांना चिखल, पाणी याचा सामना करीत बस धरावी लागली.
दीड महिन्यापासून वरूणराजाने पंढरपूर तालुक्यावर अवकृपा दाखवली होती; मात्र रविवारी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताच रविवारी व सोमवारी सायंकाळी सलग दोन दिवस पंढरपूर, वाखरी, भंडीशेगावसह पालखी मार्गावर दमदार हजेरी लावली आहे. यामुळे आषाढी यात्रा सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडत आहे. सोमवारी दुपारी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे बाजीराव विहीर येथे उभे व गोल रिंगण पार पडल्यानंतर सर्व संतांच्या पालख्यांनी मुक्कामासाठी वाखरी गाठली; मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांनी पावसाचे जल्लोष करीत स्वागतच केले.
वाखरी पालखी तळावर पालख्यांचे ठिकठिकाणी तंबू मारण्यात आले होते; मात्र त्यामध्ये महिला भाविकांना कसाबसा आश्रय मिळाला. या ठिकाणी तंबू व्यतिरिक्त कोणतीही निवाऱ्याची सोय नसल्याने अनेक भाविकांना मेनकापड, प्लास्टिकचे कागद वापरून उभी रात्र जागून काढावी लागली.
वाखरीत सर्व संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे महिनाभर पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. या ठिकाणी रात्रभर भजन, कीर्तन, भारूड व अन्य पारंपरिक खेळ सुरू असतात; मात्र सोमवारी रात्री आठच्या सुमारास झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू होता. पावसामुळे पालखी तळांवर ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने भजन, कीर्तन करणे भाविकांना शक्य नव्हते. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर पाऊस पडल्याने त्याचा भजन, कीर्तनावर मोठा परिणाम झाला.
----------------------------------------
बसस्थानकावर पाणी
यात्रा कालावधीत मुख्य बसस्थानकावर प्रवासी व वाहतुकीचा ताण येऊ नये, म्हणून चंद्रभागा मैदानावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे; मात्र सोमवारी झालेल्या धो-धो पावसामुळे या बसस्थानकाच्या सखल भागात पाणी साठून तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामध्ये बसची ये-जा सुरू असल्याने चिखल होऊन ठिकठिकाणी चिखलही झाला होता. त्याचा फटका भाविकांना बसला.
---------------------------------------
निवाऱ्याची सोय करावी
प्रत्येक वर्षी यात्रा कालावधीत पाऊस आला की त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी राज्य शासनाने भक्त निवासाच्या धर्तीवर वाखरी, चंद्रभागा वाळवंटात धर्मशाळा बांधून त्यामध्ये भाविकांची सोय करण्याची मागणी भाविकांतून जोर धरत आहे.
-------------------------------
शहरातही भाविक उघड्यावर
सर्व संतांच्या पालख्यांचा मुक्काम जरी वाखरीत असला तरी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात, वाळवंटात वास्तव्य करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या सर्व उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या भाविकांना या पावसामुळे उभी रात्र जागून काढावी लागली. काहींनी धोके पत्करून वाहनाखाली, झाडाखाली निवारा शोधण्याचा प्रयत्न केला.