सुमारे २० टक्के वारी घटण्याची शक्यता
By Admin | Updated: July 7, 2014 00:52 IST2014-07-07T00:52:49+5:302014-07-07T00:52:49+5:30
आता एक दिवसाच्या आषाढीचीच आशा

सुमारे २० टक्के वारी घटण्याची शक्यता
भंडीशेगाव: यंदाच्या आषाढी वारीवर दुष्काळाचे सावट असल्याने ४० टक्के वारकरी कमी आले. असे असले तरी ऐन आषाढीत एक दिवसाच्या वारीसाठी २० टक्के तरी वारकरी थेट पंढरपुरात येत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के वारी कमी भरेल, असा अंदाज आहे.
पंढरपूरला येणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोन मुख्य पालख्यांसमवेत दरवर्षी किमान चार लाख आषाढीची वारी १० लाखांपर्यंत जाते. यंदा मात्र दोन्ही पालख्या मिळून अडीच लाख वारकरी वाटचाल करीत आहेत. पाऊस पडो अथवा न पडो या विचाराने यात आणखी २० टक्के वाढ होईल असे अपेक्षित आहे, असे अनेक दिंडीकऱ्यांचे मत आहे. यामुळे सात ते साडेसात लाखांपर्यंत आषाढीचा सोहळा जाईल अशी अपेक्षा आहे.
याबाबत वासकर दिंडीचे राणू महाराज वासकर यांना विचारले असता, गतवर्षी आपल्या दिंडीत १००० वारकरी होते. यंदा ६५० वारकरी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आषाढी दिवशी यात थोडी वाढ होईल, असे ते म्हणाले.
पुण्याच्या मावळ भीमाशंकर परिसरात पाऊस नसल्याने भाताची लावणी झालेली नाही. आता पाऊस पडला तरी रोपे जळाल्याने नव्याने रोपे तयार करावी लागणार आहेत. या परिसरातून आलेल्या आंबेगाव तालुका दिंडीचे प्रमुख डी.आर. शिंदे, सचिव डॉ. बोराडे म्हणाले, भाताची लागण न झाल्याने आमच्या दिंडीत गतवर्षीच्या तुलनेत ६०० ऐवजी ५०० वारकरी आले आहेत.
सातारा परिसरातून आलेल्या शांत मारुती वैष्णव मंडळ दिंडीचे प्रमुख विजय शरद लेवे म्हणाले, आमच्या दिंडीतही २५० ऐवजी २०० वारकरी आले आहेत.
तिंतरवणी ता. गेवराई (जि. बीड) येथून श्रीराम संस्थानची दिंडी आली आहे. पावसाअभावी आमच्या भागात कापूस, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचा पेरा झालेला नाही. यामुळे ५०० ऐवजी ३०० वारकरी यंदा आले आहेत.
---------------------------
एकंदरीत ४० टक्के वारीत घट झाली असली तरी एक दिवसाच्या वारीसाठी २० टक्के वारकरी येतील, अशी आशा आहे. यामुळे यंदा २० टक्के वारी कमी भरेल, असे दिंडीकऱ्यांना वाटते.