आषाढी निधी वांध्यात

By Admin | Updated: June 25, 2014 01:37 IST2014-06-25T01:37:17+5:302014-06-25T01:37:17+5:30

जि़ प़ पेचात: निर्णय घेण्याची अडचण

Ashadhi fundraiser | आषाढी निधी वांध्यात

आषाढी निधी वांध्यात

सोलापूर: आषाढीसाठी जिल्हा नियोजनने १ कोटी १० लाखाचा निधी देताना अन्य कोणताही निधी घेता येणार नाही असे लिहून घेतल्याने शासनाने दिलेला एक कोटी १० लाखाचा निधी खर्च करायचा कसा? असा प्रश्न उभा आहे. एकूण रक्कम २ कोटी २० लाख झाली असली तरी खर्च करण्यास तांत्रिक अडचण आहे. निर्णय घेणारे सक्षम अधिकारी नसल्याने व प्रशासनावर विसंबून असणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे जिल्हा परिषद विकलांग बनली आहे.
आषाढी वारीनिमित्त पालखी मार्गावरील गावांना वारकऱ्यांसाठी सोई-सुविधा देण्यासाठी दरवर्षी निधी दिला जातो. यावर्षी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनमधून निधी तरतूद करण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक कोटी १० लाखाचा निधी आषाढीसाठी नाविण्यपूर्णमधुन दिला आहे. जि.प.ने शासनाकडेही निधीची मागणी केली होती. शासनाने १ कोटी १० लाखाची तरतूद केल्याचे पत्र जिल्हा परिषदेला मंगळवारी मिळाले आहे. तत्पुर्वीच नियोजनमधुन १ कोटी १० लाख देताना अन्य कोणताही निधी याच कामासाठी घेणार नाही, असे जिल्हा परिषदेकडून लिहून घेतले आहे. त्यामुळे शासनाने दिलेले १ कोटी १० लाखाचा निधी खर्च करण्याची अडचण निर्माण झाली आहे.
---------------------------
अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे तोटा
अडचण येईल त्या ठिकाणी मंत्रालयातील वरिष्ठांकडे विचारणा करण्याचे धाडस करणारे अधिकारी सध्या जि.प.मध्ये नाहीत. सुनील केंद्रेकर, वीरेंद्र सिंह हे कोणत्याही अडचणीवर तोडगा काढायचे. आता तसा कोणीच नाही. शिवाय सध्याचे पदाधिकारीही प्रशासनावर विसंबून राहणारे आहेत.
एकीकडे निधी खर्च करण्याची अडचण तर दुसरीकडे पालखी मार्गावरील ग्रामपंचायती, मजूर संस्था व ‘सुबेअ’ला कामांचे वाटप सुरू आहे. पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होण्यास आठ दिवस शिल्लक असताना निधी खर्चण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मार्ग काढला तरच दोन कोटी २० लाख रुपये खर्च होणार आहेत.
-------------------------------------
शासनाकडून निधी मिळाला असला तरी तो खर्च करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल.
- मनीषा देसाई,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Ashadhi fundraiser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.