कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पथकाची नेमणूक केली होती. लॉकडाऊनमध्ये शहरातून गावी आलेल्यांना सात दिवस क्वारंटाईन केले जात होते. त्यामुळे गावाकडे येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ही खबरदारी घेतली गेली नाही.
कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण स्वत: तपासणी करून घेत आहेत. ते बाधित आढळल्यास औषधे दिली जातात. सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यास सांगितले जाते, परंतु रुग्ण या केंद्रात जाण्यास धजावत नाहीत. ते घरीच उपचार घेण्याच्या नावाखाली फिरत राहतात. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाकडे होती, आता ती माहिती प्रशासनाकडे नाही. एक रुग्ण बाधित झाला तर त्याच्या संपर्कातील लोकांची चाचणी करून घेण्याच्या सूचना केल्या जात होत्या. परंतु सध्या तसे होताना दिसत नाही. त्यामुळे दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे.
५४ हजार ३०० जणांची तपासणी
तालुक्यात आजअखेर ५४ हजार ३०० तपासण्या केल्या आहे. त्यात ४ हजार ११० पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ७८ रूग्ण मयत झाले तर एकूण ४०२ रूग्णावर उपचार सुरू आहेत.
कोट :::::::
बाधित रूग्णांना होमआयसोलेशनला परवानगी नाही. कोविड रुग्णांसाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व डॉ.आंबेडकर प्रशाला येथे कोविड केअर सेंटर सुरू आहे. ग्रामीण भागात जेऊर येथे मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविकांची नेमणूक केली आहे.
- डॉ. सागर गायकवाड,
तालुका आरोग्य अधिकारी