आषाढीला उजनीचे पाणी नाही

By Admin | Updated: June 27, 2014 01:14 IST2014-06-27T01:14:18+5:302014-06-27T01:14:18+5:30

उजनी वजा २२ वर : गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागेत सोडणार पाणी

Aaddhali does not have lukewarm water | आषाढीला उजनीचे पाणी नाही

आषाढीला उजनीचे पाणी नाही


पंढरपूर : उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होत आहे. अशात उजनी धरणाची पाणी पातळी वजा २२ टक्के इतकी खाली गेल्याने आषाढी यात्रेसाठी उजनी धरणातून पाणी सोडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. वारीसाठी गुरसाळे बंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे कमी पाण्यातच वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान उरकावे लागणार आहे.
गेल्या महिन्यात १९ मे रोजी उजनी धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. या पाण्याने भीमा नदीवरील बंधाऱ्यात पाणी साठविण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे, पंढरपूर बंधाराही भरून घेण्यात आला असून वारीसाठी गरज भासली तर गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाईल, असे विभागाचे कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने यात्रा काळात उजनी धरणातून आणि नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पत्र देऊन करण्यात आली आहे. ते पत्र आपण कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविल्याचे शिंदे म्हणाले. उजनी धरणाखालील आलेगाव बंधारा सोडला तर भीमा नदीवरील अरळी बंधाऱ्यापर्यंतचे १४ बंधारे पाण्याने परिपूर्ण भरले आहेत. रोहिणी, मृग, आर्द्रासह सर्व नक्षत्रे कोरडी गेली आहेत. उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याअभावी पिके धोक्यात येण्याची भीती वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशी परिस्थिती असताना उजनीतून पाणी सोडणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांबरोबरच वारकऱ्यांचे पाण्याविना हालच होणार आहेत.
उजनी धरणावर विविध शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असून शासन पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देते. पावसाने ओढ दिल्याने विहिरी, बोअर आटू लागले असून ५०० फुटांपर्यंत बोअर खोल गेले तरी पाणी लागेना, इतकी पाणी पातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
--------------------------
पाणीटंचाई भासणार
पंढरपूर बंधाऱ्यातून पंढरपूर, सांगोला या शहरांसाठी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय सोलापूरच्या पाण्याची भिस्तही उजनीवरच आहे. पंढरपूर बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर त्यात वरच्या बाजूला असलेल्या गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते. आता गुरसाळे बंधाऱ्यातूनच पाणी सोडण्यात येणार असल्याने भविष्यात पाऊस लांबल्यानंतर पाणीपुरवठा योजनेला पाणी नसण्याची अधिक शक्यता आहे.
--------------------------------
उजनी धरण मायनस २२ टक्क्यांवर गेल्याने वारीसाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे सध्या अशक्य आहे. गुरसाळे बंधाऱ्यात सध्या मुबलक पाण्याचा साठा असल्याने त्यातील पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे चंद्रभागेत वारकऱ्यांसाठी स्नानासाठी पाणी येणार आहे.
- सर्जेराव शिंदे
अभियंता, भीमा पाटबंधारा, पंढरपूर विभाग

Web Title: Aaddhali does not have lukewarm water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.