येळ्ळूरचे प्रकरण : पोलिसी दहशतवादाविरुद्ध असंतोष; येळ्ळूरमध्ये ७०० पोलीस; ठिकठिकाणी बंद
By Admin | Updated: July 29, 2014 00:04 IST2014-07-28T23:52:10+5:302014-07-29T00:04:24+5:30
२४ तासांत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

येळ्ळूरचे प्रकरण : पोलिसी दहशतवादाविरुद्ध असंतोष; येळ्ळूरमध्ये ७०० पोलीस; ठिकठिकाणी बंद
बेळगाव : येळ्ळूरमध्ये रविवारी पोलिसांनी घातलेल्या हैदोसानंतर गेल्या २४ तासांत कोणतीही अनुचित घटना घडली नाही. गावात वरवर शांतता जाणवत असली तरी जनतेच्या मनात पोलिसांची दहशत असल्याचे जाणवते. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीने आज, सोमवारी पुकारलेल्या बंदला येळ्ळूरसह सीमाभागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. येळ्ळूर गावात ७०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तर बेळगाव शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
येळ्ळूर येथील फलक पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांच्या दहशतीला न जुमानता गावागावांत महाराष्ट्र राज्य असे फलक झळकू लागले आहेत. बेळगाव तालुक्यातील बाची, आमबेवाडी, मन्नूर, कंग्राळी, कडोली, गर्लगुंजी, शहरातील आनंदवाडी वडगाव आणि चव्हाट गल्ली येथे अभिमानी मराठी जनतेने ‘एक फलक पाडला तर दहा फलक उभारू’, असा इशारा प्रत्यक्ष फलक उभारून दिला. दुपारनंतर मन्नूर गावात लावलेला फलक पोलिसांनी पाडला.
गेल्या चार दिवसांपासून येळ्ळूरच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी बाहेरून येणाऱ्या लोकांना येळ्ळूरला जाण्याची मुभा दिली आहे. जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. गावातील दुकाने, व्यवहार आजपासून सुरू झाले असले तरी लोकांच्या मनात भीती कायम असल्याचे गावचा फेरफटका मारल्यावर जाणवले. रविवारी पोलिसांनी येळ्ळूरमध्ये तणाव निर्माण केल्याच्या आरोपावरून आठ निष्पाप युवकांना अटक केली आहे. बेळगावात उद्या, मंगळवारी रात्रीपर्यंत जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आज खानापूर शहर आणि (पान ४ वर)
मोदी सरकार गप्प का : राज ठाकरे
मुंबई : मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक हटविल्यावरून कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर केलेल्या अमानुष मारहाणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार गप्प का, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले, भाजपला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत काहीच घेणे-देणे नाही. अशा घटना घडल्यानंतर एखादे पत्रक काढण्यापलीकडे भाजप काही करीत नाही. अवघ्या महाराष्ट्राने शिवसेना-भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून दिले. आता या खासदारांनीच सीमावासीयांच्या भावना संसदेत मांडाव्यात. महाराष्ट्रात असा प्रकार घडला असता, तर केवढा गहजब झाला असता, असे राज म्हणाले.
४येळ्ळूर येथील हटविलेला ‘महाराष्ट्र राज्य-येळ्ळूर’ हा फलक आणि कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधील मराठी भाषिकांना केलेल्या अमानुष मारहाणीचे तीव्र पडसाद आज, सोमवारी कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात उमटले. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याबाबत कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सभागृहात सांगितले .
४विधानसभेत विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते के. एस. ईश्वराप्पा यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यावर बंदी घालण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कन्नड रक्षण वेदिकेच्या उलट्या बोंबा
दरम्यान, कन्नड रक्षण वेदिका आणि विविध कन्नड संघटनांच्यावतीने येळ्ळूर फलक प्रकरणी हजारो कन्नडिगांनी बंगलोरविधान सभेवर आज, सोमवारी मोर्चा काढला. यावेळी कन्नड संघटनांनी एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांना अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. अन्यथा, संभाजी पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करून आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.