पाठबळ नसताना ‘ते’ बनले सुभेदार
By Admin | Updated: July 28, 2015 23:54 IST2015-07-28T23:54:38+5:302015-07-28T23:54:38+5:30
मेहनतीचे फळ : तळवलीतील तरूणाची गाथा

पाठबळ नसताना ‘ते’ बनले सुभेदार
मंदार गोयथळे - असगोली -गुहागर तालुक्यातील तळवली - भेळेवाडी येथील प्रशांत शांताराम शिगवण या तळवलीच्या सुपुत्राने कोणतेही मार्गदर्शन व पाठिंबा नसताना केवळ आपल्या मित्रांच्या सोबतीने सैनिकी भरतीकडे पाऊल वळवले. स्वत: शैक्षणिक पात्रता पूर्ण करत सैनिक क्षेत्रात ‘प्रमोशन’ मिळवल्याने आज या क्षेत्रात ते सुभेदारपदी सेवा बजावत आहेत.
शिगवण यांचे मूळ गाव तळवली. परंतु त्यांचे कुटुंब पूर्वीपासून पुण्यात असल्याने त्यांचे शिक्षण तेथेच झाले. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले असले तरीदेखील आजही प्रशांत हे आपल्या गावी आवर्जून येतात. शिगवण यांना सुभेदार पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. १९९३ साली दहावी परीक्षा पास झाल्यानंतर आपल्या मित्रांसोबत त्यांनी सैनिकी शाळेत प्रवेश घेतला.
यानंतर भोपाळ येथील पूर्ण सैनिक बळाच्या यांत्रिकी शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. या ठिकाणी सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले व त्यानंतर वडोदा येथे अडीच वर्षांचे टेक्निकल ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर १ जानेवारी १९९६ साली सैन्यामध्ये सेवेला सुरुवात केली. सैनिकी सेवा सुरु झाल्यानंतर शिगवण यांनी आसाममध्ये चार वर्षे, जम्मूमध्ये ३ वर्षे, गुवाहाटी, आग्रा, उदमपूर आदी ठिकाणी टेक्निकल बेस वर्क शॉपमध्ये सुमारे पाच वर्षे सेवा केली. त्याचप्रमाणे रणगाडा विभाग, पैदल सेना, तोफखाना विभाग, ए. एम. सी. विभाग या सर्व विभागांमध्येही त्यांनी सेवा केली आहे. यामध्ये नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या असताना आॅपरेशन रेनोइन आसाम, कारगील युद्धावेळी आॅपरेशन पराक्रम, आॅपरेशन विजय यात सहभाग होता.
दहशतवादी कारवाया सुरु असतानादेखील लष्कराच्या मोहिमेत त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. एकूणच सैन्यात सेवा बजावत असताना शिगवण यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण व डिप्लोमा पूर्ण केला. तसेच डिप्लोमा इन आॅटो इलेक्ट्रॉनिक्स हा दीड वर्षाचा कोर्स, तर ज्युनिअर लीडर हा तीन महिन्यांचा कोर्सदेखील त्यांनी या दरम्यान पूर्ण केला. सैन्यात भरती झाल्यानंतर बॉक्सिंग, फुटबॉल तसेच कबड्डीसारख्या खेळात सहभाग घेत यामध्येही त्यांनी प्राविण्यासह विविध पदके मिळविली आहेत. सध्या बडोदा येथे सुमारे दीड वर्षांपासून टेक्निकल सोल्जर म्हणून तरुणांना धडे देत आहेत. एकूणच वेगवेगळ्या स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षा देऊन व शैक्षणिक पात्रता पूर्ण करुन वेळोवेळी प्रमोशन घेत ते सैन्यात सुभेदार पदापर्यंत पोहोचले आहेत.
1तरूणांना भरपूर वाव...तळवली येथे सुटीत आल्यानंतर तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर, तरूणांनी सैन्याकडे वळण्याचा सल्ला देतात शिगवण.
2कोणतेही मार्गदर्शन नसताना वेळोवेळी परीक्षा देऊन संपादन केली सैन्यातील विविध मानाची पदे. स्पर्धात्मक यशामुळे सुभेदारपदापर्यंत पोहोचले.
आपण पुण्यासारख्या शहरात शिकलो असलो तरी मिळणाऱ्या सुटीत आपण आपल्या गावाकडील म्हणजेच तळवलीसारख्या ग्रामीण भागात आवर्जून भेट देतो. येथील तरुणांमध्ये सैनिक भरतीसाठी अफाट गुणवत्ता आहे. मात्र, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.