वर्षभर गुणपत्रकाविना!
By Admin | Updated: July 22, 2015 23:56 IST2015-07-22T22:20:52+5:302015-07-22T23:56:49+5:30
विद्यापीठाची अनागोंदी : परीक्षेत उत्तीर्ण होऊनही वर्ष वाया

वर्षभर गुणपत्रकाविना!
चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका डीबीजे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. २०१४मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने त्यांना नोकरीसाठी प्रयत्ना करता आले नाहीत, किंवा इतर ठिकाणी प्रवेशही घेता आला नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट सुरु आहे.
मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या ऐश्वर्या पेंडसे व इतर ५३ विद्यार्थ्यांची गुणपत्रके न मिळाल्याने त्यांना इतर ठिकाणी प्रवेश घेता आला नाही किंवा त्यांना नोकरीसाठी प्रयत्नही करता आले नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने महाविद्यालयाकडे संपर्क साधला व चौकशी केली असता आठ दिवस थांबा, असे त्यांना वारंवार सांगितले गेले. परंतु, वर्ष झाले तरीही याप्रकरणी सुधारणा झालेली नाही. अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांचे करिअर दावणीला लागले आहे.
डी. बी. जे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने केवळ एकदाच मुंबई विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला आहे. यावरुन महाविद्यालयाच्या प्रशासनाची उदासीनता दिसून येते. कोणतीही ठोस पावले न उचलल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाने या प्रकरणी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तरच या प्रश्नाला वाचा फुटेल. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थीवर्गात नाराजी आहे.
विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधल्याने कुलगुरुंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असेल. यात सुधारणा केली जाईल, असे कुलगुरु डॉ. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महाविद्यालयाच्या बाजूने जेवढे प्रयत्न करायला हवेत तेवढे आम्ही केले आहेत. अर्थात विद्यापीठ ही यंत्रणा मोठी आहे. जेव्हा आम्ही तेथे पाठपुरावा करतो, संपर्क साधतो, त्यावेळी त्यांच्याकडून संकेत मिळाले. परंतु, गुणपत्रक आले नाही ही वस्तुस्थिती आहे.
- डॉ. श्याम जोशी, प्राचार्य,
डीबीजे महाविद्यालय, चिपळूण