व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा ‘अ’ विजेता
By Admin | Updated: January 10, 2015 00:11 IST2015-01-09T22:02:20+5:302015-01-10T00:11:46+5:30
प्रत्येक नागरिकाने सुरक्षा रक्षक बनणे गरजेचे आहे. --जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले,

व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा ‘अ’ विजेता
आचरा : महाराष्ट्र पोलीस दल दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाने आचरा पोलीस ठाणे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी दल सदस्यांच्या घेण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा सागर सुरक्षा दलाच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते चषक, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मालवण, निवती, विजयदुर्ग, वेंगुर्ला आणि आचरा दलाच्या दोन संघांनी सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, मालवण पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे रजपूत, देवगड पोलीस निरीक्षक गंभीर, आचरा सरपंच मंगेश टेमकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, देशाच्या सुरक्षेचा विचार करता सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला देश सुरक्षित बनवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने सुरक्षा रक्षक बनणे गरजेचे आहे. यावेळी सागर सुरक्षा रक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना अधीक्षक बाविस्कर म्हणाले, सागर सुरक्षा रक्षकांचे कार्य महनीय असून अनेक दहशतवादी कारवाया या सुरक्षा रक्षकांमुळे रोखू शकलो. देशाविरोधात होणारे हल्ले रोखता आले. दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे.
यावेळी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, यशराज संघटना, उत्कृष्ट पंच म्हणून काम करणारे सुरेंद्र सकपाळ व सुभाष भाट यांचा जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)