बंधाऱ्यात पाणी ‘मुरतंय’

By Admin | Updated: November 4, 2015 23:57 IST2015-11-04T22:32:16+5:302015-11-04T23:57:28+5:30

गुरूनाथ पेडणेकर : जलव्यवस्थापन समिती सभेत पाणलोटच्या कामांबाबत नाराजी

Water in mud | बंधाऱ्यात पाणी ‘मुरतंय’

बंधाऱ्यात पाणी ‘मुरतंय’

सिंधुदुर्गनगरी : मे महिन्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून राज्य अधीक्षक कृषी विभागाकडून पाणलोट अंतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी घालण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचत नसल्यामुळे या सर्व बंधाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी केली. या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करून या प्रकरणात तथ्य असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी सांगत नोव्हेंबर अखेर पाणलोटअंतर्गत सर्व बंधाऱ्यांची पहाणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती गुरुनाथ पेडणेकर, संजय बोंबडी, स्नेहलता चोरगे, समिती सदस्य जनार्दन तेली, भारती चव्हाण, दिलीप रावराणे, सुगंधा दळवी, संजीवनी लुडबे, वासुदेव परब, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी पाणलोट अंतर्गत बांधण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे बंधारे निकृष्ट असल्याचे सांगत मे अखेरपर्यंत या बंधाऱ्यात पाणी साचत नसल्याचे सांगून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. याच विषयास अनुसरून उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा मुद्दा उपस्थित करत या अभियानांतर्गत शासनाचे प्रति बंधाऱ्यासाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च करून हे बंधारे वैयक्तिक मालमत्तेत उभारले गेले आहेत. या बंधाऱ्यांची पाहणी करणार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


१२८0 बंधारे बांधून पूर्ण : जिल्हा परिषदेचे नियोजन
जिल्हा परिषदेने यावर्षी १० हजार कच्चे व पक्के बंधाऱ्यांच्या उद्दिष्ट्यापैकी आजपर्यंत १२८० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यात कच्चे ६१० बंधारे तर ६७० पक्के बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यावर आपले मत मांडताना उपाध्यक्ष देसाई म्हणाले की, बंधारे बांधताना बहुतेक ठिकाणी रिकाम्या सिमेंट पिशव्यांमध्ये मातीने भरलेले दोनच थर लावले जातात. तसे न करता भविष्यातील पाणीटंचाईवर मात करायची असेल तर चार ते पाच थरांचा बंधारा घाला अशा सूचना लघुपाटबंधारे विभागाला केल्या. तसेच नळपाणी पुरवठ्याच्या योजना ज्या ठिकाणी आहेत त्या गावात मोठा बंधारा घालण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करा असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी लघुपाटबंधारे विभागाला दिले.


निधीअभावी भूजलच्या योजना ठप्प
भूजल सर्र्वेक्षण विभागामध्ये सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये विविध प्रकारच्या ५४ योजना प्रस्तावित आहेत. मात्र, या योजनांसाठी निधीच उपलब्ध झाला नसल्याने ही कामे सुरु होऊ शकली नाहीत अशी माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
एम.आर.ई.जी.एस.मधून निधीची तरतूद करा
पावसाळ्यामध्ये चिऱ्यांच्या खाणींमधून पाण्याची साठवण केली तर भविष्यात पाणीटंचाई उद्भवणार नाही अशी सूचना सदस्य जनार्दन तेली यांनी वर्षभरापूर्वी केली. त्यानुसार देवगड तालुक्यातील पडेल येथील एका खाणीमध्ये तब्बल २ लाख ४ हजार लीटर एवढा पाणीसाठा सद्यस्थितीत उपलब्ध असून यावर शासनाचे केवळ १ लाख ७० हजार रुपये खर्च झाला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगत एम.आर.ई.जी.एस. मधून यासाठी निधीची तरतूद करा असे सांगण्यात आले.

Web Title: Water in mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.