वैभववाडी नगरपंचायतमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’
By Admin | Updated: November 2, 2015 23:56 IST2015-11-02T22:47:49+5:302015-11-02T23:56:48+5:30
कोणालाच स्पष्ट बहुमत नाही : काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, विकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष

वैभववाडी नगरपंचायतमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस किंवा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी दोघांनीही विजयोत्सव साजरा केला. मतमोजणीच्या प्रारंभी काँग्रेस जोशात होती. मात्र बहुमताचा आकडा गाठता येत नसल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांची पांगापांग झाली. काँग्रेसला बहुमत मिळू न शकल्याने महायुतीत उत्साह संचारला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंना ‘थोडी खुशी थोडा गम’ असेच काहीसे चित्र पहायला मिळाले.
निवडणूक झालेल्या तेरा प्रभागांची चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत प्रभाग एकमध्ये शिवसेनेच्या रोहन रावराणेंकडून काँग्रेसच्या संताजी रावराणे यांचा निसटता पराभव झाला त्याचप्रमाणे प्रभाग दोन मधून भाजपचे संतोष माईणकर यांनी काँग्रेसचे प्रकाश सुतार यांच्यावर तब्बल ५९ मतांनी एकतर्फी विजय मिळवला. तरीही दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेस सहा जागा जिंकून सुसाट होती. उर्वरित पाच पैकी किमान तीन जागा जिंकण्याची खात्री काँग्रेसला होती. मात्र प्रभाग अकरा आणि बारामधील उमेदवार पराभूत झाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसीलमधून काढता पाय घेतला.
मतमोजणी पूर्ण झाल्यावर महायुतीने विकास आघाडीच्या उमेदवारांना बरोबर घेऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेत फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून विजयी मिरवणूक काढली. तर काँग्रेसने आमदार संपर्क कार्यालयापासून दत्तमंदिरापर्यंत मिरवणूक काढली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने शिवसेना आणि भाजपने तर आमदार नीतेश राणे यांच्या मतदार संघातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. आमदार नीतेश राणे तीन आठवडे वैभववाडीत ठाण मांडून बसल्यामुळे युतीनेही प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रचारात उतरवून पूर्ण ताकद पणास लावली होती. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही दहा दिवसांत तीन दौरे केल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. काँग्रेसला प्रतिष्ठेच्या प्रभाग एक, अकरा आणि बारामध्ये पराभव पत्करावा लागला आहे. प्रभाग एकमधून शिवसेना नेते जयेंद्र रावराणे यांचे सुपुत्र रोहन रावराणे यांनी काँग्रेसचे माजी सभापती अरविंद रावराणे यांचे चिरंजीव संताजी रावराणे यांचा एका मताने पराभव केला. त्याच प्रमाणे प्रभाग अकरामध्ये शिवसेनेचे संतोष पवार काँग्रेसच्या मंगेश चव्हाण यांचा ९ मतांनी पराभव करून निवडून आले. तर आमदार नीतेश राणे यांचा मुक्काम असलेल्या प्रभाग बारामधून जेष्ठ कार्यकर्ते सज्जनराव रावराणे यांच्या सौभाग्यवती सरिता रावराणे यांनी युवक काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रफुल्ल रावराणे यांची पत्नी प्राची रावराणे यांचा ९ मतांनी पराभव केला आहे. शिवसेना आणि भाजपच्या प्रभाग सहा मधील मैत्रीपुर्ण लढतीचा फायदा काँग्रेसला झाला. या ठिकाणी काँग्रेसच्या संपदा शिवाजी राणे यांनी ४१ मते मिळवत शिवसेनेच्या विद्या पाटील यांच्यावर १२ मतांनी मात केली. या ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ५३ एवढी होत आहे. तर प्रभाग आठ मधून अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या मनिषा गणेश मसूरकर यांनी काँग्रेसच्या रुपाली महाडिक यांचा आठ मतांनी पराभव केला. काँग्रेसने प्रभाग चारमधून अक्षता जैतापकर यांना अकरा मतांनी निवडून आणून राष्ट्रवादीचे वनिता गुलाबराव चव्हाण यांना घरच्या मैदानात पराभूत करून आघाडी तोडल्याचा वचपा काढला. त्यामुळे वैभववाडीत सत्ता स्थापनेपर्यंत अनेक राजकीय उलथापालथी होणार
आहेत. (प्रतिनिधी)
संमिश्र कौल : सत्तेच्या सारीपाटात झुलवाझुलवी
वैभववाडीच्या मतदारांनी सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या आश्वासनांना न भूलता संमिश्र कौल देत कोणालाच बहुमत न देता सत्तेच्या किल्या विकास आघाडीकडे सोपविल्या आहेत. वैभववाडीतील नागरिकांनी नगरपंचायतीच्या सतराही जागा जिंकण्याच्या इर्षेने उतरलेल्या काँग्रेसला सात जागांवर रोखले असून रवींद्र रावराणेंच्या पाठींब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ आठ झाले आहे. तर सत्तेच्या माध्यमातून विकासाची स्वप्ने दाखवून बहुमत मिळवू पाहणाऱ्या महायुतीच्या पारड्यात सहा जागा टाकून दोघांनाही सत्तेच्या सारीपाटावर झुलवत ठेवले आहे. त्यामुळे चार जागा जिंकलेल्या विकास आघाडीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे.
संमिश्र कौल : सत्तेच्या सारीपाटात झुलवाझुलवी
वैभववाडीच्या मतदारांनी सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या आश्वासनांना न भूलता संमिश्र कौल देत कोणालाच बहुमत न देता सत्तेच्या किल्या विकास आघाडीकडे सोपविल्या आहेत. वैभववाडीतील नागरिकांनी नगरपंचायतीच्या सतराही जागा जिंकण्याच्या इर्षेने उतरलेल्या काँग्रेसला सात जागांवर रोखले असून रवींद्र रावराणेंच्या पाठींब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ आठ झाले आहे. तर सत्तेच्या माध्यमातून विकासाची स्वप्ने दाखवून बहुमत मिळवू पाहणाऱ्या महायुतीच्या पारड्यात सहा जागा टाकून दोघांनाही सत्तेच्या सारीपाटावर झुलवत ठेवले आहे. त्यामुळे चार जागा जिंकलेल्या विकास आघाडीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे.