मुंबई-गोवा चौपदरीकरणाला टोल बसणारच : अनंत गीते
By Admin | Updated: June 13, 2015 00:15 IST2015-06-12T23:09:34+5:302015-06-13T00:15:20+5:30
जैतापूर प्रकल्प : शिवसेनेचा विरोधच

मुंबई-गोवा चौपदरीकरणाला टोल बसणारच : अनंत गीते
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गासाठी चार हजार कोटी खर्च असून, हा निधी वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर टोल आकारला जाणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी सावंतवाडी येथे केले. ते मुंबई-गोवा चौपदरीकरणाविषयी चर्चा करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, प्रकाश परब, नगरसेविका अनारोजिन लोबो, अशोक दळवी, दत्तू नार्वेकर, लवू भिंगारे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री गीते म्हणाले की, ‘जैतापूर’ प्रकल्पासाठी बाधित जमीन ही भूकंपाला अनुकूल आहे. या कारणाने भविष्यात नेपाळसारख्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल. याचबरोबर प्रकल्प झाल्यानंतर या प्रकल्पामुळे कोकणाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानेच जनतेची सुरक्षा लक्षात घेऊनच ‘जैतापूर’ प्रकल्पाला कायमस्वरूपी विरोध राहणार असल्याचे गीते यांनी सांगितले.