एकाच माटवीखाली तीन गणपती
By Admin | Updated: September 22, 2015 00:13 IST2015-09-21T21:56:21+5:302015-09-22T00:13:23+5:30
काळसेतील केळुसकर कुटुंबिय : पिढ्यानपिढ्या जपताहेत परंपरा

एकाच माटवीखाली तीन गणपती
अमोल गोसावी- चौके --कोकणामध्ये गणेश चतुर्थी म्हटली की, धार्मिकता, परंपरा, श्रद्धा अतिशय उत्साहाने जपली जाते. सर्वसामान्यपणे प्रत्येक घरात एक गणपती मूर्ती असून त्यांची सेवा केली जाते. परंतु याला अपवाद आहे मालवण तालुक्यातील काळसे वरचावाडा येथील केळुसकर कुटुंबियांचे घर. या घरामध्ये एकाच घरात एकाच माटवीखाली, एकाच मंचावर तीन गणेशमूर्तींचे पूजन केले जाते.
काळसे वरचावाडा येथील किशोर महादेव केळुसकर आणि कुटुंबिय यांचे मोठे घर आहे. एकुण अकरा कुटुंबे या घरात राहतात. या त्यांच्या घरामध्ये वर्षानुवर्षे तीन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करुन गणेश चतुर्थी साजरी करण्याची प्रथा आहे. अशा प्रकारे एकाच माटवीखाली तीन गणपती पूजन होणारे हे कोकणातील एकमेव कुटुंब असावे असा त्यांचा विश्वास आहे.
परंपरेविषयी किशोर केळुसकर म्हणाले की, परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. ती प्रथा केव्हांपासून आणि का सुरु झाली हे आम्हालाही माहित नाही. आमची चौथी पिढी असून पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आम्ही जोपासतोय.
हिंदुस्तान- पाकिस्तान एक असताना आमचे पूर्वज कराची येथे तंबाखूच्या व्यापाराच्या निमित्ताने स्थायीक झाले होते. त्यावेळीही ते चतुर्थीच्या निमित्ताने कळसे गावात यायचे. त्यानंतर कालांतराने भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर काही पूर्वज कराचीतून इकडे येऊन राहिले तर काहीजण फाळणीनंतर तिकडेच होते. पण १९६७-६८ च्या दरम्यान सर्वजण पूर्णपणे कराची सोडून इकडे आले. गावात स्थायीक झाले.
सध्या आमच्या घरात अकरा कुटुंब असून २४ भाऊ आहेत. १३५ जणांचे केळुसकर कुटुंबीय असून ८४ वर्षांच्या श्रीमती गंगाबाई नारायण केळुसकर या घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्या आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असलेले सर्व केळुसकर कुटुंबिय गणेशोत्सवाला एकत्र येतात.
गणेश गणशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यात होम करुन घरात शुद्धीकरण विधी करावा लागतो. आणि गणेश चतुर्थी दिवशी ती गणेश मूर्ती आणू त्यांची पूजा केली जाते. आणि गणेश चतुर्थी दिवशी पहिले भजन या गणपतीकडे केले जाते नंतरच वाडीतील इतर गणपतींचीही भजने केली जातात. तसेच गौरी विसर्जन झाल्यानंतरच या गणपतींचे विसर्जन केले जाते. या अगोदर विसर्जन करता येत नाही.
त्यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे घरात कायम भरपूर माणसे असल्याने दरवाजांना त्यामुळे कुलुपही लावले जात नव्हते. अशा प्रकारे केळुसरक कुटुंबियांची आगळी चतुर्थी संपूर्ण जिल्हात प्रसिद्ध असून सर्व कुटुंबिय अतिशय श्रद्धेने आणि आनंदात ही परंपरा जोपास आहेत. समाजासमोर एकत्र कुटुंबपद्धीता चांगला आदर्श समाजासमोर ठेवत आहेत.
गणपतींबरोबर तीन नागोबांचेही पूजन
तीन गणपतींबरोबरच नागपंचमीला तीन नागोबाही पूजले जातात. असे असले तरी या घराची गुढी मात्र एकच असते हे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमा, हरतालिका पूजनही ही संपूर्ण वाडीचचे याच घरात होते. आता केळुसकर कुटुंबातील सदस्य कामानिमित्त, व्यावसायानिमित्त बाहेर राहत असले तरी दोन पिढ्यांपूर्वी सर्वजण याच भव्य घरात राहायचे.