पोलीस असल्याचा बनाव करणाऱ्यांना अखेर अटक
By Admin | Updated: January 10, 2015 00:22 IST2015-01-09T23:09:44+5:302015-01-10T00:22:53+5:30
सहाजणांचा समावेश : मेर्वीतील डिसेंबर महिन्यातील घटना

पोलीस असल्याचा बनाव करणाऱ्यांना अखेर अटक
रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमधील संशयिताना आश्रय दिल्याने चौकशीसाठी आलो असल्याची बतावणी करीत व पोलीस असल्याचा बहाणा करीत घरात शिरणाऱ्या सहा संशयितांना पूर्णगड सागरी पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील मेर्वी गावी १४ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडला होता.
याप्रकरणी ज्या सहाजणांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये सुभाष शिवराम गमरे (४२, रा. परळ), पुंडलिक कृष्णा जाधव (५६, इचलकरंजी), समीर सुभाष खेतले (३०, देवरुख), धर्मराज जयराम म्हामूरकर (५९, जयसिंगपूर, कोल्हापूर), सचिन जयराम कांबळे (३३, देवरुख), सुरेश जगन्नाथ खोत (३८, शाहूवाडी) यांचा समावेश आहे. याशिवाय प्रकाश इंगळेसह तिघेजण अजून फरारी आहेत.
१४ डिसेंबर २०१४ रोजी मेर्वी धनगरवाडी येथील ओंकार मनोहर अभ्यंकर यांच्या घरासमोर गाड्या लावून १० ते १५ अज्ञात घरात घुसले. आम्ही पुणे येथील पोलीस असून, दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात तपासासाठी आलो आहोत, असे सांगून मनमानी केली होती. तुम्ही दाभोलकर हत्येतील संशयितांना आश्रय दिला, असे अभ्यंकर कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, घरच्यांनी या अज्ञातांना झडती वॉरंट आहे का? असे विचारत घराची झडती घेण्यास विरोध केला होता. तरीही या अज्ञातांनी अभ्यंकर यांच्या देवघरापासून सर्व खोल्यांची झडती घेतली आणि सामान अस्ताव्यस्त केले.
या लोकांकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे तक्रारवजा निवेदन ओंकार अभ्यंकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. पोलिसांनी या संशयितांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता १०पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. (प्रतिनिधी)