रत्नागिरीत दहा हजार वीजजोडण्या
By Admin | Updated: August 22, 2014 23:20 IST2014-08-22T23:00:21+5:302014-08-22T23:20:03+5:30
महावितरण : वर्षभरात निवासी इमारतींच्या संख्येत मोठी भर

रत्नागिरीत दहा हजार वीजजोडण्या
रत्नागिरी : अपार्टमेंट्सच्या वाढत्या संख्येमुळे महावितरणच्या वीज जोडण्यांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १० हजार ११५ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३,१९९ म्हणजेच ३१ टक्के जोडण्या फक्त रत्नागिरी विभागात देण्यात आल्या. रत्नागिरीत अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात ७,८६६ घरगुती वीज मीटरच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत. ११५७ वाणिज्य मीटर, ८५ औद्योगिक मीटर देण्यात आले आहेत. पथदीप १९२, तर कृषीपंप ६५६ देण्यात आले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठाचे ५०, तर उच्च दाबाच्या औद्योगिक वीज जोडण्या ४ दिल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ११५ वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी विभागात घरगुती २५०७, वाणिज्य ४०६, पथदीप २८, औद्योगिक ४७, सार्वजनिक पाणीपुरवठा १८९, लघुदाबाच्या अन्य १६ जोडण्या मिळून ३,१९९ जोडण्या देण्यात आल्या आहेत. चिपळूण विभागात घरगुती १३९२, वाणिज्य १७६, पथदीप २०, औद्योगिक ९, कृषिपंप ४६, पाणीपुरवठा ५ मिळून १६४४ नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. खेड विभागात घरगुती १२०६, वाणिज्य १७८, औद्योगिक १५, कृषिपंप ८८, सार्वजनिक पाणीपुरवठा १३, अन्य १९ मिळून १५१३ नवीन जोडण्या वर्षभरात देण्यात आल्या. तिन्ही विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात सर्वाधिक जोडण्यात दिसून येत आहेत.
मुंबई, पुणेच्याबरोबरीनेच कोकणात स्वत:चे घर असावे, अशा सेकंड होमची मागणी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. परिणामी नवीन जोडण्या वाढत असलेल्या दिसून येत आहेत. घरे बांधण्याच्या तुलनेत इमारती अधिक आहेत.त्यासाठी जोडणीची गरज आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड विभागांचा विचार करता रत्नागिरी विभागात वीज जोडण्यांना मागणी दिसून येत आहे. रत्नागिरीत घरे घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम वाढत आहे. त्यामुळे घरगुती मीटरमध्ये वाढ होत आहे.
एस. पी. नागटिळक,
महावितरण रत्नागिरी.