योग्य खबरदारी घ्या
By Admin | Updated: July 30, 2014 22:59 IST2014-07-30T22:50:34+5:302014-07-30T22:59:10+5:30
प्रवीण सौदाणे : वेंगुर्लेत शोध, बचाव कार्यशाळा

योग्य खबरदारी घ्या
वेंगुर्ले : देश विघातक कृत्ये करणारे सर्रासपणे समुद्री जलमार्गाचा वापर करून किनारपट्टीमार्गे प्रवेश करतात. यापूर्वी घडलेल्या घटनांत ते दिसून आले आहे. सागराशी नियमित संपर्कात असलेला मच्छीमार हा नेहमीच शासनास सहकार्य करतो. अनोळख्या व्यक्ती, त्यांच्या संशयास्पद हालचाली, संशयास्पद वस्तू, संशयास्पद वाहन याबाबत मच्छिमारांनी सतर्कता बाळगून नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी. देशाची सागरी सुरक्षा अबाधित राखण्यास सहकार्य करावे, असे प्रतिपादन नौदलाचे कॅप्टन प्रवीण सौदाणे यांनी वेंगुर्लेत आयोजित कार्यशाळेत केले.
मत्स्य व्यवसाय विभाग वेंगुर्ले व वेंगुर्ले मच्छिमार सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्वामिनी मंगल कार्यालयात भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी यांचे मच्छिमारांसाठी शोध व बचाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॅप्टन प्रवीण सौदाणे बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नौदलाचे उत्तम नाविक, मनोज थापा, अश्विन खेडेकर, वेंगुर्ले कस्टम निरीक्षक संजीवकुमार, सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी विजय कांबळे, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर, वेंगुर्ले मच्छिमार सहकारी संस्थेचे चेअरमन वसंत तांडेल, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी किनारपट्टी व समुद्रातील घडामोडी, अनोळखी व्यक्ती व त्यांचा वापर याविषयी वेळोवेळी शासनाच्या यंत्रणेस क ळवून देशाची सुरक्षा वाढवा, असे आवाहन केले.
यावेळी मच्छिमारप्रमुख प्रतिनिधी बाबी रेडकर, गणपत चोडणकर, पुुंडलिक केळूसकर, जनार्दन खडपकर, मोहन कोचरेकर, भरत पेडणेकर, सद्गुरू मलबारी यासह सागरी सुरक्षा रक्षक व मच्छिमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)