माहेरच्या संस्कारांमुळेच यशस्वी
By Admin | Updated: January 10, 2015 00:27 IST2015-01-09T23:42:55+5:302015-01-10T00:27:45+5:30
सुमित्रा महाजन : चिपळूण येथे नागरी सत्कार; बालपणीच्या आठवणींना उजाळा

माहेरच्या संस्कारांमुळेच यशस्वी
चिपळूण : चांगले संस्कार समाजात टिकून असतात. माझ्यावर बालपणी झालेल्या संस्कारामुळेच मी आज चांगले काम करत आहे. ही तुमच्याच संस्काराला तुम्ही दिलेली दाद आहे. चांगल्या संस्काराचे प्रतिबिंब समाजात उमटत असते, असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा आणि चिपळूणची माहेरवाशीण सुमित्रा महाजन यांनी केले.
चिपळूण येथील अण्णासाहेब क्रीडा संकुलात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व चिपळूण नगर परिषद यांच्यातर्फे लोकसभा अध्यक्ष महाजन यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारापूर्वी श्रीदेव विरेश्वर मंदिर परिसरात गजानन फडके नगरीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्षा महाजन यांच्या हस्ते झाले. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आई-बापाविना असणारी पोर मधुकाका बर्वे यांनी पदरात घेतली. इथपासून ते आपले वडील आप्पा साठे यांच्या दराऱ्याबाबत व चिपळूणमधील सर्व समाजाशी त्यांची जुळलेली नाळ त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केली.
चिपळूणची माणसं प्रथमपासूनच कोणतेही काम एकत्र येऊन करायचे. येथे अनेक घटना घडल्या. परंतु, त्याचा परिणाम समाज जीवनावर कधीही झाला नाही. अडचणीच्या काळात सर्व चिपळूणकर एकत्र येऊन मदत करीत, हे चिपळूणचं चरित्र आजही कायम आहे. हे कायम राहणे जरुरीचे आहे. कारण त्यातून माणूस घडत असतो. माहेरची ओढ प्रत्येकाला असते. माहेरात ताकद आहे. मी येथून जाताना प्रामाणिकपणा नेला. चिपळूणमध्ये आमचं घरी नाही, पण प्रत्येक घरात आपल्याबाबत प्रेम आहे. हा संस्कार आहे. पैसे कमविण्याची गरज नाही. जेवढे आहे तेवढे मिळेल, हे सांगताना त्या गहिवरल्या होत्या. चिपळूणचे संस्कार घेऊन सासरी गेले. तेथे टिकून राहिले म्हणूनच मला चांगले काम करता आले. बॅ. अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा कोकणवासियांना आनंद झाला. त्यांनीही कोकणच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कोकणातील माणसांत एकमेकांबद्दल प्रेम असते. याबाबत त्यांनी काही दाखले दिले.
आपण कोकण विकासाच्या गप्पा मारतो, पण कोकणातील पर्यटन जपले पाहिजे. येथील समुद्रकिनारे प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरले आहेत. माझ्याकडून कोकणासाठी जे जे करता येईल ते मी करेन, असे त्या आवर्जून म्हणाल्या.
शतायू ग्रंथालयाची योजना चांगली आहे. ग्रंथ, ग्रंथकार यांच्याशी माणूस जोडलेला आहे. त्यातूनच माणूस जगेल ही कल्पना चांगली आहे. आपण ही कल्पना आपल्या सासरी सांगू. जे चिपळूणमध्ये झाले ते इंदोरमध्ये व्यापारी राजधानीत का होणार नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. संस्कारक्षम पिढी बनविण्यासाठी ग्रंथालयांचे काम महत्त्वाचे आहे. ग्रंथालय शतायू होणे ही फार कठीण गोष्ट आहे. चिकाटीने वाचनालय चालविणे अवघड आहे, असेही त्यांनी कौतुकाने नमूद केले.
आपल्या शालेय जीवनाबद्दल व जुन्या शिक्षकांच्या आठवणी सांगताना त्यांनी जुन्या कविता सांगितल्या. जुने शिक्षक घराघरांत पोहोचलेले असत. त्यांना घराची माहिती असे. शिक्षक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असत. आता परिस्थिती बदलली आहे. कदाचित वर्गात जास्त मुलेही असतील. पण, मुलांचा चेहरा शिक्षकांना वाचता आला पाहिजे. ७० वर्ष होऊनही तो संस्कार आजही आठवतो, असे त्या म्हणाल्या.
चिपळूण नगर परिषदेतर्फे नगराध्यक्षा सावित्री होमकळस, तर वाचनालयातर्फे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी अध्यक्षा महाजन यांचा सत्कार केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माधव गवळी, लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रज्ञा धनावडे, संजय भुस्कुटे, मुख्याधिकारी गणेश जावडेकर उपस्थित होते. लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कांता कानिटकर यांनी मानपत्राचे वाचन केले. (प्रतिनिधी)