राज्यात येईल शिवशाहीची लाट
By Admin | Updated: August 5, 2014 23:31 IST2014-08-05T22:54:22+5:302014-08-05T23:31:03+5:30
उद्धव ठाकरे : केसरकरांसह हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात येईल शिवशाहीची लाट
सावंतवाडी : विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात जात असतात; पण आता स्थिती उलटी आहे. सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षाकडे येऊ लागले आहेत. यापुढे महाराष्ट्रात शिवशाहीची लाट येणार असून, ही त्याची नांदी आहे. दीपक केसरकर आणि त्यांच्या समर्थकांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार भगवे झाले आहे. येत्या निवडणुकीत राज्यातही भगवा फडकेल, असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी येथील शिवसेना मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी आज, मंगळवारी येथील जिमखाना मैदानावर आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, अरुण दुधवडकर, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर,
केसरकरांचे सोने करा : नाना पाटेकर
मी मुंबईतून सिंधुदुर्गकडे येण्यासाठी निघत असतानाच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा फोन आला. यावेळी त्यांनी मला सांगितले की, मी तुमच्याकडे चांगला माणूस पाठवीत असून त्याचे सोने करा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हाच धागा पकडून, आजपर्यंत जे कोळशाच्या खाणीत होते, ते आता सोन्याच्या खाणीत आले आहेत. केसरकरांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
कन्नडिगांचा अत्याचार
कानडी लांडगे घरात घुसून अत्याचार करीत आहेत. मात्र, सर्वजण मूग गिळून गप्प बसले आहेत. शिवसेनेच्या खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडला आहे. आपण केंद्र शासनाकडे सीमावर्ती भाग केंद्रशासित करा, अशी मागणी करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
जैतापूर प्रकल्पाला विरोधच
जैतापूर प्रकल्प स्थानिकांना नको असल्यास होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये जाऊन वीज विकत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ज्यांना पाहिजे त्यांनी जैतापूर घेऊन जावा. आम्ही त्यांच्याकडून वीज विकत घेऊ, असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शिवसेनेचा जैतापूरला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
राणे अस्तित्व संपलेले नेते
नारायण राणे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांचे अस्तित्वच संपले, त्यांच्याबद्दल काय बोलायचे? ब्रह्मदेवाचा बापही आपले काही करू शकणार नाही, असे म्हणणाऱ्यांना जनतेनेच कायमचे संपविले आहे.